राज्य सरकारच्या वतीने डिसेंबर महिन्यात रायगड किल्ल्यावर ‘रायगड महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
रायगडावर शिवकालीन वातावरण तयार करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सक्षम नेतृत्वातील महाराष्ट्राचे वैभव या ठिकाणी प्रत्यक्ष साकाण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे देशात प्रथमच अशा पद्धतीचा महोत्सव साजरा करण्यात येणार असून; भारतीय इतिहास व ऐतिहासिक वास्तूंची गौरवशाली परंपरा सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असणार आहे.
रायगड महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यात साज-या होणा-या ‘रायगड महोत्सवात’ शिवकालीन वातावरण प्रत्यक्षात उभे करण्यात येईल आणि देशात अशा पद्धतीचा महोत्सव साजरा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.
२५ ते ३१ डिसेंबर २०१५ या सातदिवसीय कालावधीत रायगड किल्ल्यावर आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी विविध उपक्रमांचा समावेश असलेला रायगड महोत्सव आयोजित करण्यात येईल. ऐतिहासिक स्मारकाच्या जतनासंदर्भातील केंद्र सरकारचे नियम व अटी पाळून रागयड किल्ल्यावर शिवकालीन वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
याकरता दररोज रोप वने ६०० ते ७०० आणि पायी ४ हजार ते सहा हजार असे एकूण सुमारे पाच हजार ते सात हजार व्यक्ती किल्ल्यावर शिववैभवाचे साक्षीदार होण्यासाठी येतील. तर पायथ्याशी उभारण्यात येणा-या ‘शिवसृष्टीला’ रोज अंदाजे ३० ते ४० हजार व्यक्ती भेट देतील, असा अंदाज आहे.
चांगली बातमी