लखनऊ : आयपीएल खेळत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सने आतापर्यंत तीन सामने खेळले. यातील एकाच सामन्यात त्यांचा विजय झाला. उर्वरित दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला. पण या कामगिरीने नाही तर संघाचा कर्णधार रिषभ पंतमुळे संघ व्यवस्थापनाला फसवणूक झाल्यासारखे वाटू लागले आहे.

संघ व्यवस्थापनाने आयपीएल २०२५ साठी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याची कर्णधार म्हणून निवड केली. पंतला त्यांनी २७ कोटी रुपये मोजून खरेदी केले. पण २७ कोटी घेणाऱ्या पंतने आयपीएल २०२५ आतापर्यंत फक्त १७ धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रिषभ पंत शून्य धावा करून परतला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात १५ आणि पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात पाच चेंडूत दोन धावा करुन तो परतला. पंत पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात बाद झाला त्यावेळी एक कॅमेरा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या उद्योगपती संजीव गोएंका यांच्या दिशेने फिरवण्यात आला. गोएंका यांचा चेहरा पडल्याचे त्यावेळी स्पष्ट दिसून आले.
उद्योगपती संजीव गोएंका हे लखनऊ सुपर जायंट्सचे मालक आहेत. यामुळे त्यांना २७ कोटी रुपये वाया जात असल्याचे बघून दुःख झाल्याचे दिसून आले. सामना संपल्यानंतर गोएंका डगआउटमध्ये आले आणि पंतशी बोलले. सामन्यानंतर पंतने स्वतः स्कोअरबोर्डवर कमी धावा पराभवाचे कारण असल्याचे मान्य केले.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात संजीव गोयंका यांच्या फ्रँचायझी, लखनौ सुपर जायंट्सने एकूण ११९.९० कोटी रुपये खर्च केले आणि १९ खेळाडूंना खरेदी केले, ज्यात भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा समावेश आहे. पंतला २७ कोटी रुपये खर्च करुन खरेदी करण्यात आले. पण तीन सामन्यांतील कामगिरी बघता संघातील पंतसह अनेक खेळाडू अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे.