बुद्धिचातुर्य

स्नेहधारा : पूनम राणे


एक राजा होता. त्याला एक कन्या होती. तिचे नाव दामिनी. दामिनी, अतिशय देखणी, जणू सौंदर्याची खाणच! राजकन्या लग्नायोग्य झाली होती. अनेक ठिकाणाहून राजकन्येला मागणी येत होती; परंतु राजकन्येने एक अट घातली होती. तिने आपली अट राजाला बोलून दाखवली.


“आपल्याला जो मुलगा पसंत करेल, त्याची एक परीक्षा घेतली जाईल.” त्या परीक्षेत जो पास होईल, त्याच्याशीच मी विवाह करेन.” देशोदेशीच्या राजकुमारांना वार्ता समजते. दिवस ठरतो.


राजवाडा वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी सजवण्यात आला होता. रस्त्याच्या दुतर्फ्याला रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. राज दरबार भरला होता. राजकन्या दामिनी हातात वरमाला घेऊन राजाच्या उजव्या बाजूला उभी होती. राजा सिंहासनावर बसला होता. राजाच्या डाव्या बाजूला प्रधानजी उभे होते. देशोदेशीचे राजकुमार राज दरबारात उपस्थित होते.
समोरच वेगवेगळ्या प्रकारची पाने ठेवण्यात आली होती. आकाराने छोटी मोठी. प्रधानजींनी दवंडी दिली, ऐका हो ऐका, “ समोर ठेवलेली पाने घेऊन पानांतून समोरच असलेल्या तलावातून पाणी घेऊन यायचे.”


“ही कोणती परीक्षा! असे स्वतःशीच पुटपुटत राजकुमार कुजबूज करायला लागले आणि समोर ठेवलेली दोन-तीन पाने घेऊन निघाले. अर्धा तास झाला, पाणी काही पानात राहत नव्हते. घरामध्ये नोकर-चाकर होते. त्यामुळे कोणत्याच प्रकारचं काम त्यांनी यापूर्वी केलेले नव्हतं. तरीही काहीजण पाने घेऊन तलावापर्यंत पोहोचले. पानांना एकत्र करून तलावात बुडवण्याचा प्रयत्न करू लागले; परंतु पानावर पाणीच येत नव्हते. तलावाच्या बाजूलाच एक गरीब मेंढपाळ मुलगा होता. तो दुरूनच हे सर्व पाहत होता.


राजकुमार पाने पाण्यात बुडवून वर काढत होते. मेंढपाळ मुलाने पाहिलं आणि तो जवळ आला आणि म्हणाला, ‘‘मी दाखवतो पानात पाणी कसे राहील ते!” असे म्हणून त्याने करवंदीचे काटे काढले. पानांचा खोला केला. करवंदीच्या काट्याने त्याने पाने एकमेकांना जोडली आणि पाणी भरून एका राजकुमारला त्यांनी देऊ केलं.” परंतु राजकुमार म्हणाला, ‘‘नाही, नाही,” हे सारे श्रेय तुझेच आहे. तू आमच्यासोबत चल. असे म्हणून राजकुमार त्या मेंढपाळला घेऊन राजाकडे आले. सारी हकीकत सांगितली.


मात्र ही परीक्षा मेंढपाळ मुलाने जिंकली. हे काही राजाला मान्य नव्हते; परंतु राजकन्येने हट्ट केला. “लग्न करेन तर, या मेंढपाळ मुलाशीच!” शेवटी राजाला राजकन्येचा हट्ट पूर्ण करावा लागला आणि मेंढपाळ मुलगा राजाचा जावई झाला. केवळ देखणेपण व श्रीमंती असून चालत नाही, तर आपले कर्तृत्वच आणि बुद्धिचातुर्यच आपलं आयुष्य उज्ज्वल करत असतं.

Comments
Add Comment

हिमालयाचा इशारा

भास्कर खंडागळे नेपाळचा महाप्रलय हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा आणि हवामानबदलाच्या वाढत्या परिणामांचा इशारा

योग्यवेळी परतफेड

अनिल रा. तोरणे आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन

आव्हानांना सामोरं जाण्याचा माईंडसेट

डॉ. स्वाती गानू दहावी किंवा बारावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येतो - “हे सगळं

'देव जरी मज कधी भेटला...'

श्रीनिवास बेलसरे ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना

भाषासक्तीने भाषाप्रेम वाढेल, की भाषाभेद ?

निशा वर्तक भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या

मंगलतीर्थ

भालचंद्र ठोंबरे निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व