मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं, अंधेरी सब वे पाण्याखाली

मुंबईसह कोकणात धुमाकूळ! मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत


मुंबई: उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून, अंधेरी सब वे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक मंदावली आहे, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.


पवई, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे सखल भागांत पाणी भरण्यास सुरुवात झाली असून, लालबहादूर शास्त्री मार्गावर भांडूपजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.



राज्यात मान्सूनचा जोर, अनेक जिल्ह्यांत 'रेड' आणि 'ऑरेंज' अलर्ट


मान्सूनने संपूर्ण कोकण व्यापले असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे, तर संपूर्ण कोकणात पुढील दोन ते तीन दिवस मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


दक्षिण गुजरात परिसरात पुढील २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याने, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, गोंदिया, भंडारा आणि नागपूरमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः सातारा आणि पुण्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.


कोकणात नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत


संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. घाट परिसरातून प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे.


मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली आहे. डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. परशुराम घाटाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


राजापूर शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या संगमावर असलेल्या राजापूर शहरातील जवाहर चौकापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.


सिंधुदुर्गातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली-आचरा राज्य मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे १५ ते २० गावांचा संपर्क तुटला असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.


सिंधुदुर्गात समुद्रालाही उधाण आले असून, किनाऱ्यावर ३ ते ३.५ मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याने सखल भागात पाणी साचले आहे. होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे, तर तेरेखोल नदी इशारा पातळीवर वाहत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


कोल्हापुरातही पावसाची संततधार


कोल्हापुरात पावसाची रिपरिप सुरूच असून, पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १७ फूट १० इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. राधानगरी धरणाच्या पायथा विद्युतगृहातून प्रतिसेकंद २५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. कुंभी धरणाच्या पायथा विद्युतगृहातूनही प्रतिसेकंद ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पात्रात पाण्याची मोठी आवक होत असल्याने भोगावती, पंचगंगा आणि कुंभी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर