Ritu Tawde : तुमच्या घरात आयाबहिणी नाहीत का? मुंबईच्या महापाैर रितू तावडे कडाडल्या, सरळ म्हणाल्या...

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या घशाच्या आजाराबाबत केलेल्या एका विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात वादाचे वादळ निर्माण झाले आहे. "गुरुदेवजींच्या आशीर्वादाने माझ्या घशाची जुनी समस्या दूर झाली, हा माझ्यासाठी एक चमत्कारच आहे," असे विधान तावडे यांनी एका कार्यक्रमात केले होते. मात्र, राज्यात सध्या अशोक खरात यांचे भोंदूगिरीचे प्रकरण गाजत असताना, एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने 'चमत्कार' शब्द वापरल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.



पत्रकार परिषदेत व्यक्त केला संताप


सतत होणारी टीका आणि समाजमाध्यमांवरील चर्चेनंतर महापौर रितू तावडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. यावेळी त्या अत्यंत आक्रमक पावित्र्यात दिसल्या. "माझ्या विधानाचा विपर्यास केला जात आहे. हा विषय अंधश्रद्धेचा नसून पूर्णपणे माझ्या वैयक्तिक श्रद्धेचा आहे. कोणाच्या आशीर्वादाने जर मला बरे वाटत असेल, तर त्यात कोणाला पोटदुखी होण्याचे कारण काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वादात उडी घेणाऱ्या संजय राऊत यांच्यावरही महापौरांनी कडक शब्दांत टीका केली. "संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही, ते कोणत्याही विषयावर तथ्यहीन बोलत असतात," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझ्या श्रद्धेची टिंगल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आपल्या भूमिकेचे समर्थन करताना रितू तावडे यांनी एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, "ज्या जैन मुनींच्या कार्यक्रमात मी हे विधान केले, त्या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.



नेमका काय घडलं ?


महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, काही काळापूर्वी त्या गुजरातमध्ये गुरुदेव नम्रमुनी महाराज यांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह, नगरसेविका राखी जाधव आणि धर्मेश गिरी हे देखील उपस्थित होते. यावेळी महापौरांनी महाराजांना आपल्या गळ्याच्या त्रासाबद्दल सांगितले असता, त्यांनी तावडे यांना नियमितपणे 'ओम'चा उच्चार करण्याचा सल्ला दिला. महाराजांनी सांगितल्यानुसार मी दररोज सकाळी उठून 'ओम'चा उच्चार करण्यास सुरुवात केली. जेव्हा आपण 'ओम' म्हणतो, तेव्हा गळ्याच्या स्नायूंचा एक प्रकारचा नैसर्गिक व्यायाम होतो. या नियमित सरावामुळेच आज माझा गळा पूर्णपणे बरा झाला आहे. ही माझी वैयक्तिक भावना आणि आलेला अनुभव मी व्यक्त केला होता," असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले. यात कुठेही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हेतू नव्हता, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. टीकाकारांना उत्तर देताना रितू तावडे म्हणाल्या की, "आम्ही सर्वजण स्वामी समर्थ महाराज आणि साईबाबांचे निस्सीम भक्त आहोत. आदरणीय नम्रमुनीजींचे आम्ही मार्गदर्शन घेतो. एखाद्या गोष्टीमुळे जर सकारात्मक बदल घडत असेल, तर त्याला अंधश्रद्धा म्हणणे चुकीचे आहे. हा केवळ श्रद्धेचा आणि योगाचा विषय आहे."



"बातमी लावण्याची ही कोणती पद्धत?"


"मी कार्यक्रमावरून अजून नीट घरीही पोहोचले नव्हते, त्यापूर्वीच माझ्या विधानावरून चुकीच्या पद्धतीने बातम्या लावल्या गेल्या. कोणाबरोबर कोणाची तुलना केली जात आहे? अशा प्रकारच्या बातम्या पाहून मला खरोखर किळस वाटते," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कालच्या कार्यक्रमात काय सकारात्मक घडले, यावर चर्चा करण्याऐवजी केवळ वादाला खतपाणी घातले गेले, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. सोशल मीडियावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या ट्रोलर्सवर महापौरांनी कठोर भाषेत प्रहार केला. "जे लोक ट्रोल करत आहेत, त्यांच्या घरी आया-बहिणी आहेत की नाही? कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कशा पद्धतीने ट्रोल केले जाते? अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे हे अतिशय निंदनीय आहे," असे तावडे म्हणाल्या. अशोक खरात यांच्या प्रकरणाशी स्वतःच्या श्रद्धेचा संबंध जोडला गेल्याने महापौरांनी दुःख व्यक्त केले. "मी माझी वैयक्तिक श्रद्धा आणि अनुभव व्यक्त केला होता, पण त्याला चुकीच्या पद्धतीने प्रसिद्धी देऊन माझ्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अशा प्रकारच्या वागणुकीमुळे मनाला वेदना होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर