- मविआत दुफळी; शरद पवार गटाची भूमिका निर्णायक, हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दरबारी
मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ रिक्त जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला असतानाच, महाविकास आघाडीत उमेदवारीवरून कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. मविआच्या वाट्याला येणाऱ्या एका हक्काच्या जागेवर उद्धव ठाकरे स्वत: रिंगणात उतरणार की अन्य शिलेदाराला संधी दिली जाणार, याबाबतचा सस्पेंस कायम असतानाच आता काँग्रेसनेही शड्डू ठोकला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट दिल्ली गाठून हायकमांडकडे स्वतंत्र उमेदवारासाठी आग्रह धरल्याने आघाडीच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या सत्तासंघर्षात आता शरद पवार गटाचे १० आमदार ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असून, त्यांच्या मतांचे पारडे ज्या बाजूला झुकेल, त्याचाच मार्ग सुकर होणार आहे.
नऊ जागांच्या निवडणुकीत एका उमेदवाराला विजयासाठी २९ मतांच्या कोट्याची गरज आहे. महाविकास आघाडीकडे सध्या एकूण ४६ (उबाठा २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट १०) आमदार आहेत. या संख्याबळावर एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो, परंतु दुसऱ्या जागेसाठी १० ते १२ अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करण्याचे मोठे आव्हान मविआसमोर असेल. राज्यसभेच्या वेळी झालेल्या राजकीय तडजोडीनुसार, यावेळी शरद पवार गटाने माघार घ्यावी आणि ही जागा उबाठाला सोडावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, काँग्रेसने आता या जागेवर आपला दावा ठोकल्याने तिढा वाढला आहे.
बारामतीच्या बदल्यात राष्ट्रवादी मदत करणार?
काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी :
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत धाव घेऊन आपली मागणी लावून धरली आहे. काँग्रेसमधून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, स्वतः हर्षवर्धन सपकाळ, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत, हनमंत पवार आणि राजेश राठोड यांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे, उबाठा गटाकडून उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार की अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे किंवा सूरज चव्हाण यांपैकी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






