ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील सेटीस ब्रिजवर आज म्हणजेच गुरुवार २३ एप्रिल रोजी ‘शिवशाही’ बसला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. उन्हाच्या तडाख्यात आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे १५ प्रवासी होते. मात्र आग लागल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांनी तत्काळ बसमधून बाहेर पडत धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याच्या जोरदार फवाऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेत अग्निशमन दलाला सहकार्य केले.
मात्र आग प्रचंड भडकलेली असल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी बसचा फक्त सांगाडा उरल्याचे दिसून आले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक व प्रवाशांची हालचाल विस्कळीत झाली होती.