मुंबई : ममता बॅनर्जी यांच्या पराभवामुळे बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. सर्वत्र भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा आणि ममता बॅनर्जींच्या पराभवाचा जल्लोष साजरा होत आहे. याच जल्लोषात आता प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री देखील मागे नाहीत. बंगालमधील भाजपच्या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देत विवेक अग्निहोत्री यांनी "आता भीतीशिवाय जगा" असं म्हंटल आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हणाले विवेक अग्निहोत्री ?
इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं की, “पुन्हा कधीच नाही. अनेकांना माहिती नाही, पण 'द कश्मीर फाइल्स' प्रदर्शित झाल्यानंतर मला बंगालमध्ये अडवण्यात आलं. माझा चित्रपट सिनेमागृहांतून काढून टाकण्यात आला आणि मला राज्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
या सगळ्या घटनांचा उल्लेख करत विवेक अग्निहोत्री यांनी “सिर उठाकर चलो...” असं म्हणत आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, निवडणुकीपूर्वी त्यांनी 'द बंगाल फाइल्स'अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. “आम्ही कधीच हार मानली नाही. गुप्तपणे हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवला. आमचा लढा सुरूच ठेवला आणि अखेर हा अभूतपूर्व विजय मिळाला. बंगालच्या जनतेचं अभिनंदन. आता तुम्ही भीतीशिवाय जगू शकता,” असंही त्यांनी म्हटलं.
'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट अभिषेक अग्रवाल आर्ट्स आणि आयएम बुद्धा प्रोडक्शन्स यांच्या निर्मितीत तयार झाला आहे. १९४०च्या दशकातील बंगालमधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, विशेषतः 'कलकत्ता हत्याकांडा'च्या दरम्यान झालेल्या हिंसाचारावर हा सिनेमा आधारित आहे. त्या काळातील अस्थिरता, विचारसरणीतील संघर्ष आणि अस्तित्वासाठीची झुंज यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.