धरमशाला : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ५४ साखळी सामने (लीग मॅच) झाले आहेत. धरमशाला येथे आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात साखळी सामना होत आहे. हा यंदाच्या हंगामातील ५५ वा साखळी सामना आहे. धरमशालातील सामना वगळता साखळी फेरीचे आणखी १५ सामने व्हायचे आहेत. अद्याप कोणताही संघ बाद फेरीत अर्थात प्लेऑफ राउंडमध्ये पोहोचलेला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या तीन संघांचे प्रत्येकी ११ साखळी सामन्यांनंतर (लीग मॅच) प्रत्येकी १४ गुण आहेत. पंजाब किंग्सचे १० साखळी सामन्यांनंतर (लीग मॅच) १३ तर चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांचे प्रत्येकी ११ साखळी सामन्यांनंतर (लीग मॅच) प्रत्येकी १२ गुण आहेत. यामुळे अव्वल सहा पैकी बाद फेरी अर्थात प्लेऑफ राउंडसाठी कोणते चार संघ पात्र ठरणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. आयपीएलमध्ये प्लेऑफ राउंडसाठी चुरस आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचे १० साखळी सामन्यांनंतर (लीग मॅच) ९ झाले आहेत तर दिल्ली कॅपिटल्सचे ११ साखळी सामन्यांनंतर (लीग मॅच) ८ गुण झाले आहेत. पुढील सामने जिंकून अव्वल संघांचे गणित बिघडवण्याची क्षमता या संघांमध्ये आहे. यामुळे सध्या तर्कवितर्क जोरात सुरू आहेत.
लीग राउंड अर्थात साखळी सामन्यांची फेरी संपल्यानंतर गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले संघ क्वालिफायर १ खेळतील. विजेता संघ आयपीएल फायनल खेळेल तर क्वालिफायर १ चा पराभूत संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळेल. गुणतालिकेत तसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेले संघ एलिमिनेटर खेळतील. या सामन्यातील विजेत्याला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळण्याची संधी मिळेल तर पराभूत संघाचे आव्हान संपेल. क्वालिफायर १ आणि क्वालिफायर २ या दोन्ही सामन्यांचे विजेते आयपीएल फायनल खेळतील.