नाशिक : पहिल्याच पावसाच्या तडाख्यात कपालेश्वर मंदिर परिसरातील 'बिवलकर वाडा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जुन्या वाड्याची भिंत कोसळली, तसेच छताचे पत्रेही उडून गेले. या दुर्घटनेमुळे परिसरात उपस्थित असलेल्या अनेक भाविकांना दुखापत झाली असून, एका भाविकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या कारभाराविरुद्ध भाविक आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. (Nashik News )
सदरील वाड्याची मिळकत ही 'संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर' (Kapaleshwar Temple) या संस्थेने खरेदी केलेली आहे. या मिळकतीमधील अर्धा भाग अत्यंत धोकादायक झाला असल्याने तो उतरवून घेण्याबाबत महापालिकेने यापूर्वीच नोटीस बजावली आहे, तर उर्वरित अर्ध्या भागात अनधिकृत बांधकाम असून त्यावर महापालिकेच्या वतीने कारवाई प्रलंबित आहे.
या संपूर्ण जागेबाबत आणि तिथल्या धोकादायक बांधकामाविषयी संस्थानने वेळोवेळी महानगरपालिकेशी लेखी पत्रव्यवहार केला होता. मात्र, महापालिकेने यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. प्रशासनाच्या याच ढिसाळ आणि बेफिकीर कारभारामुळे अखेर हा अनर्थ घडला.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील अशा धोकादायक बांधकामांमुळे भाविकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असून, भविष्यात घडणाऱ्या संभाव्य दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.