ठाणे : जून महिन्यातील नऊ दिवस झाले तरी पावसाला सुरुवात झालेली नाही. उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. अशातच ठाण्यात कोरम मॉलसमोर जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.
जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा मोठा फवारा उडाला. पाणी जवळच तयार होत असलेल्या मेट्रो लाईनपर्यंत पोहोचले. कोरम मॉलसमोर मोठे कारंजे सुरू झाले. पाण्याचा फवारा थेट मेट्रो लाईनच्या खांबांना आणि ट्रॅकला घासून वर उडत होता. यामुळे परिसरातील वाहतूक मंदावली.
आधीच ठाणेकर अपुऱ्या पाणीपुरवठ्याने त्रस्त आहेत. अशातच जलवहिनी फुटल्यामुळे आता ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच ठाणे मनपाच्या अभियंत्यांनी घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचे काम सुरू केले. पण मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्यामुळे पाणीकपात अपरिहार्य आहे.
ठाण्याची दैनंदिन पाणी मागणी ५९० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) आहे. सध्या ५३ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) तूट आहे. आता जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी तूट वाढण्याची शक्यता आहे. यामुळे ठाणे मनपाने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.