मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
पी. वेलरासू (२००२ बॅच) यांच्या १६ जून रोजीच्या बदली आदेशात अंशतः बदल करण्यात आला असून, आता त्यांची 'एमएमआरडीए'च्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (२००३ बॅच) यांची मंत्रालयातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर, 'एमएमआरडीए'चे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार (२००४ बॅच) यांच्याकडे आता महापारेषणच्या (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.