Bishnoi : बिश्नोई टोळीसह भाडोत्री गुंडांचा बंदोबस्त करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; परदेशातील 'व्हीपीएन कॉल्स' आणि 'मास्किंग'चे जाळे उद्ध्वस्त करणार



मुंबई : परदेशात बसून 'व्हीपीएन' तंत्रज्ञानाचा वापर करत आणि 'मास्किंग'द्वारे मुंबई, पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिश्नोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून लाख-दोन लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत, नागरिक-उद्योजकांनी घाबरण्याचे कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले, तरी त्यांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने पावले उचलली जात असून, या भाडोत्री गुंडांवर 'मकोका' लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.



विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बिश्नोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार अस्लम शेख आणि बापूसाहेब पठारे यांनीही उपप्रश्न विचारले. बिश्नोई टोळीच्या नव्या कार्यपद्धतीबाबत (मोडस ऑपरेंडी) माहिती देताना फडणवीस म्हणाले की, या टोळ्यांचे मुख्य आका तुरुंगात गेल्याने गँगमध्ये फूट पडली असून, आता आरझू बिश्नोई आणि रोहित गोधरा अशा दोन वेगवेगळ्या गँग वर्चस्वासाठी लढत आहेत. परदेशात लपून बसलेले यांचे हस्तक व्हीपीएनद्वारे धमक्यांचे फोन करतात. समोरची व्यक्ती घाबरली नाही, तर ते नाद सोडून देतात; मात्र कोणी घाबरल्याचे दिसल्यास यूपी-बिहारमधून १-२ लाख रुपये देऊन भाडोत्री गुंड मागवले जातात. त्यांच्याकडून घर किंवा दुकानावर हवेत गोळीबार घडवून आणला जातो. हा समोरच्याला मानसिकदृष्ट्या घाबरवून खंडणी उकळण्याचा प्रकार आहे. आतापर्यंत झालेल्या अशा सर्व हल्ल्यांमधील पकडलेले आरोपी हे भाड्याचे गुंड निघाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आमदार अस्लम शेख यांनी २०१४ प्रमाणेच मुंबई पोलिसांचे विशेष 'अँटी-एक्स्ट्रॉशन' पथक अधिक मजबूत करण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "मुंबई पोलिसांचा इंटेलिजन्स देशात सर्वोत्तम असून, अशा टोळ्यांचा छडा लावण्यात आपले पोलीस तज्ज्ञ आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बाबतीतही असाच प्रयत्न झाला असता आम्ही आरोपींना पकडून मोक्का लावला होता. आता हे गुंड पोकळ धमक्या देण्याचे काम करत आहेत. एका देशातून ३-४ देशांचे नेटवर्क फिरवून (मास्किंग) फोन केले जात असल्याने तांत्रिक अडचणी येतात, मात्र तरीही पोलीस त्यांचा माग काढत आहेत. यासाठी पोलिसांची विशेष टीम अधिक सक्षम केली जाईल."






मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड रडारवर



पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातही अशा धमक्यांच्या तीन घटना घडल्याचा मुद्दा आमदार बापूसाहेब पठारे यांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "या टोळ्यांचे मुख्य कॉन्सन्ट्रेशन मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील धनिक वर्गावर आहे. पुण्यातही हवेत गोळीबार करणाऱ्या भाडोत्री गुंडांना आपण तात्काळ अटक करून त्यांच्यावर मकोका लावला आहे. पोलिसांनी यापूर्वीच अनमोल बिश्नोई आणि प्रवीण लोणकरला अटक केली असून ते तुरुंगात आहेत. आता परदेशातून सूत्रे हलवणारा बिश्नोईचा लहान भाऊ (तिसरा बिश्नोई) सक्रिय आहे. या टोळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून चालत असल्याने केंद्र सरकारला संपूर्ण माहिती देण्यात आली असून, या गँगस्टर्सना भारतात परत आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने कायदेशीर कारवाई सुरू आहे."

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर