MPSC Paper Leak : एमपीएससीच्या 'औषध निरीक्षक' भरतीतील पेपरफुटीला नवे वळण; तक्रारदाराचा 'यू-टर्न'

फेरपरीक्षा देण्यासाठी रचला बनाव?



मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेतील कथित पेपरफुटी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा ई-मेल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित परीक्षा पुन्हा व्हावी यासाठीच हा बनाव रचण्यात आल्याचे तक्रारदाराने दुसऱ्या ई-मेलमध्ये म्हटल्याची चर्चा आहे.



एमपीएससीतर्फे २२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक भरतीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. १२ जून रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर १ ते २१ जुलै या कालावधीत यशस्वी उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आणि २२ जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, निवड यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २३ जुलै रोजी एमपीएससीला ई-मेलद्वारे एक तक्रार प्राप्त झाली. परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा, तसेच काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरीत्या वाढल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. तक्रारदाराने व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड्स आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) फॉरेन्सिक तपासाची मागणीही केली होती.


तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन एमपीएससीने तात्काळ पावले उचलत तक्रारदाराला सर्व उपलब्ध पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, संबंधित संशयित उमेदवार आणि तक्रारदाराला प्रत्यक्ष चौकशीसाठी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. या सर्वांच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई निश्चित केली जाणार होती.



तक्रारीवर चौकशी सुरू असतानाच, गुरुवारी रात्री या प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडल्या. तक्रारदाराने एमपीएससीला आणखी एक ई-मेल पाठवून आपली पूर्वीची तक्रार बनावट असल्याचे कळवले. "जवळच्या काळात पुन्हा परीक्षा होण्याची शक्यता नसल्याने, जुनी परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेतली जावी यासाठीच हा बनाव रचला होता," अशी कबुली तक्रारदाराने या ई-मेलमध्ये दिल्याची माहिती एमपीएससीतील सूत्रांनी दिली आहे. २० मार्च रोजी झालेल्या कथित संभाषणाची तक्रार तब्बल चार महिन्यांनंतर (२४ जुलै) का करण्यात आली, यामागील मूळ कारणांचा तपास आता आयोग करत आहे.



सखोल चौकशी करा - रोहित पवार


हा विषय आता सार्वजनिक झाला असून परीक्षार्थींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तक्रारदार आज काय विधान करतोय यापेक्षा आमच्याकडे आलेल्या पुराव्यांवर सरकार आणि आयोग काय कारवाई करते, हे महत्त्वाचे आहे. सोनम वांगचुक यांच्यासारख्या व्यक्तीवर उपोषण मागे घेण्यासाठी दबाव आणला जाऊ शकतो, तर मग या साध्या तक्रारदारावर दबाव आणला गेला नाही कशावरून? त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर