पाटणा : बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रशांत किशोर यांचा विजय झाला. त्यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा १९ हजार ३२४ मतांनी पराभव केला. प्रशांत किशोर यांना ६४ हजार १५१ मते मिळाली तर नीरज कुमार यांना ४४ हजार ८२७ मते मिळाली. या निकालामुळे भाजपच्या बिहारमधील सरकारच्या स्थैर्याला धक्का लागणार नाही. पण विजयानंतर प्रशांत किशोर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
View this post on Instagram
जनसुराज पक्षाचे एकमेव आमदार असलेल्या प्रशांत किशोर यांनी विजयानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केलेल्या वक्तव्यातून ते भाजपला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत. बिहारच्या जनतेने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला राज्यासाठी एका 'चांगल्या' मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा संदेश दिल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.
बांकीपूर हा विधानसभा मतदारसंघ पाटणा शहरात आहे. अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपची हक्काची जागा म्हणून ओळखला जात होता. याच मतदारसंघातून नितीन नवीन आमदार झाले होते. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राज्यसभेवर निवडून आल्यानंतर आमदारीकीचा राजीनामा दिला. यामुळेच बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक झाली. भाजपने या पोटनिवडणुकीसाठी पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या नीरज कुमार यांना उमेदवारी दिली तर जन सुराज पार्टीकडून स्वतः प्रशांत किशोर रिंगणात उतरले होते. यामुळे पोटनिवडणुकीत नीरज कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यात चुरस होईल असे चित्र निर्माण झाले होते. प्रत्यक्षात मतमोजणीवेळी सुरुवातीपासूनच प्रशांत किशोर आघाडीवर दिसत होते. हळू हळू आघाडी वाढवत प्रशांत किशोर यांनी पोटनिवडणूक जिंकली. निकाल जाहीर झाल्यानंतर बांकीपूरच्या जनतेचा विजय झाल्याचे सांगत प्रशांत किशोर यांनी ही पोटनिवडणूक केवळ आमदार निवडण्यापुरती मर्यादित नव्हती तर जनतेने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला राज्यासाठी एका 'चांगल्या' मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा संदेश दिल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा संशयास्पद आचरण, चारित्र्य किंवा प्रतिष्ठा असलेली व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रिपदी जनतेला नको आहे. त्याऐवजी, बिहारला अशा नेत्याची गरज आहे जो शिक्षण सुधारू शकेल, तरुणांसाठी रोजगार निर्माण करू शकेल आणि लोकांना रोजगाराच्या शोधात इतरत्र स्थलांतर करावे लागणार नाही हे सुनिश्चित करेल. बिहारच्या विकासाला प्राधान्य द्या. बिहार सुधारण्यावर, तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यावर आणि स्थलांतर थांबवण्यावर लक्ष केंद्रित करा. जन सुराज पक्ष आमदार होण्यासाठी नाही तर राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठीच स्थापन केल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. विजयानंतर जन सुराज पक्षाने प्रशांत किशोर यांची विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला. पक्षासाठी सुवर्णयुगाची सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया याप्रसंगी कार्यकर्त्यांनी दिली.






