केवळ 7 मतांनी मारली बाजी! श्रेया कालराने जिंकली लॉक अप 2ची ट्रॉफी
मुंबई : 'लॉक अप 2' या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा ग्रँड फिनाले पार पडला असून, यंदाच्या पर्वाची विजेती म्हणून श्रेया कालराची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण सीझनभर विविध टास्क, वाद, भावनिक क्षण आणि स्पर्धात्मक वातावरणानंतर अखेर श्रेयाने ट्रॉफीवर नाव कोरले. विजेतेपदासोबतच तिला 1 कोटी रुपयांचे बक्षीसही देण्यात आले. तर अभिनेत्री शिवांगी जोशीने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. ( Lock Upp 2)
ग्रँड फिनालेचे सूत्रसंचालन फराह खान (Farah Khan) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी केले. विजेत्याची निवड जेलर, स्पर्धक आणि 'पब्लिक ज्युरी' यांच्या मतदानाच्या आधारे करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक गटाने आपल्या पसंतीच्या स्पर्धकाला मत दिल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. ( Shreya Kalra)
अंतिम फेरीत श्रेया कालरा आणि शिवांगी जोशी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. दोघींनाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. मात्र, अखेरीस केवळ 7 मतांच्या फरकाने श्रेयाने बाजी मारत 'लॉक अप 2'चे विजेतेपद पटकावले.
विजयानंतर ट्रॉफी स्वीकारताना श्रेया भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. या शोसाठी मानसिक, शारीरिक आणि भावनिक पातळीवर खूप मेहनत घेतल्याचे तिने सांगितले. मिळालेली 1 कोटी रुपयांची रक्कम तिच्यासाठी मोठा आधार ठरेल, असेही ती म्हणाली. यावेळी फराह खान यांनी हलक्याफुलक्या अंदाजात इतर स्पर्धकांच्या मानसिक आरोग्याबद्दल विचारले असता, "मी जिंकले तर सगळ्यांच्या थेरपीचा खर्च करेन," असे उत्तर देत श्रेयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ( Entainment News)
दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी श्रेया कालराच्या सातत्यपूर्ण खेळाचे कौतुक करत तिच्या विजयाचे स्वागत केले. तर दुसरीकडे, शिवांगी जोशीचे चाहतेही ती विजेतेपदासाठी तितकीच पात्र असल्याचे मत व्यक्त करताना दिसले. अनेक सोशल मीडिया युजर्सनी दोन्ही फायनलिस्टनी संपूर्ण सीझनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याचे नमूद केले. (Lock Upp 2 Winner)