Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, शनिवारपासून राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील एकूण ७ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी केला आहे.



विविध विभागांमधील पावसाची स्थिती:


१. मराठवाडा: मराठवाड्यात मान्सूनचे ढग पुन्हा दाटून आले आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या पाच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विशेष 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या भागात काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह आणि विजांच्या लखलखाटासह पाऊस पडू शकतो. तसेच या दरम्यान ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


२. उत्तर महाराष्ट्र: उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर परिसरातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. या दोन्ही जिल्ह्यांमधील घाटमाथ्यासह काही भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


३. कोकण आणि मुंबई परिसर: कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे अपेक्षित आहे. काही भागांत अचानक मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता असून संपूर्ण किनारपट्टीवर वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मात्र, सध्या कोकणातील कोणत्याही जिल्ह्यासाठी हवामान विभातर्फे कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.


४. पश्चिम महाराष्ट्र: पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही पावसाची संततधार किंवा हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातही सध्या कोणताही हाय अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.


हवामानातील या बदलामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असले तरी, पिकांना या पावसाची गरज असलेल्या भागांत यामुळे दिलासा मिळणार आहे. नागरिकांनी हवामानाच्या या स्थितीचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे आणि सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर