- मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करा
मुंबई : हवामानातील बदल आणि वाढत्या तापमानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, तांत्रिक नोंदी आणि कागदपत्रांतील त्रुटींमुळे अनेक शेतकरी विमा नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. या सर्व त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करण्याचे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी दिले. (Nitesh Rane)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळपीक विमा नुकसानभरपाईच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत सन २०२५-२६ मधील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) सहभाग घेतला. याशिवाय सिंधुदुर्गचे जिल्हा कृषी अधिकारी, सीएससीचे व्यवस्थापक वैभव देशपांडे, भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुंभारे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत आदी या वेळी उपस्थित होते. (Fruit Crop Insurance)
कागदपत्रांतील त्रुटींमुळे काही विमा प्रस्ताव रद्द झाल्याची बाब या वेळी बैठकीत निदर्शनास आली. त्यावर बोलताना मंत्री राणे यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. ज्या प्रकरणांमध्ये त्रुटी आहेत, त्यांची पूर्तता करून ते प्रस्ताव पुन्हा कार्यान्वित करण्यात यावेत. तसेच हवामान केंद्रांशी संबंधित तांत्रिक बाबी, महसूल मंडळांच्या नोंदी आणि विमा दाव्यांतील अडचणी सोडविण्यासाठी कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. (Sindhudurgh)