Mangal Prabhat Lodha : '‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश गणेशोत्सवातून द्यावा; गणेश मंडळांनी समाजप्रबोधनावर भर द्यावा'

मुंबई : मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवातील देखावे व सजावट ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाच्या अनुषंगाने साकारून समाजप्रबोधनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. "सार्वजनिक गणेशोत्सवाला जनजागृतीची परंपरा आहे आणि त्यामुळे या गणेश उत्सवात मंडळांनी आपले देखावे, किंवा सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या समाजाला ड्रग समस्येविरुद्ध एकत्र आणावे. जेणेकरून आपले तरुण अधिक सजग होतील आणि अधिक मोठ्या प्रमाणात ड्रग-फ्री मुंबई ची शपथ घेतील" असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. नाना चौक येथील महापालिकेच्या डी विभाग कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात मंगळवारी मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांसोबत समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ७० पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व समन्वय समितीचे प्रतिनिधी, महापालिका अधिकारी, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, दक्षिण मुंबईतील नगरसेवक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अग्निशमन दल तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री लोढा बोलत होते. गणेशोत्सव मंडळांना महापालिका, पोलीस आणि वाहतूक पोलिसांची विविध परवानगी एक खिडकी पद्धतीने मिळावी, यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना लोढा यांनी दिल्या. तसेच गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.



समुद्रात किंवा बाणगंगेमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याची मागणी गणेश मंडळांनी केली असून त्याबाबत कोर्टात देखील सुनावणी सुरु आहे. या मागणीमागे आपल्या बाप्पाचे भव्य विसर्जन व्हावे ही भावना असल्याने ती भावना जपण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू असे लोढा यांनी सांगितले. कृत्रिम तलाव देखील भव्य स्वरूपात उभारता येऊ शकतात का ? या बाबत अभ्यास करावा असे लोढा यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुचवले. ऑगस्ट क्रांती मैदान येथे ५ ते ६ फूट उंचीचा विस्तृत कृत्रिम तलाव उभारण्यात यावा. तसेच अन्य संभाव्य विसर्जनस्थळांचीही पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे लोढा यांनी सांगितले. खेतवाडीमध्ये गणेशोत्सवासाठी देशभरातून भाविक येत असल्याने त्यांच्यासाठी आवश्यक खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. गिरगाव चौपाटीवरील निर्माल्य वेळेत उचलण्यासाठी महापालिकेने दिवसातून दोन वेळा कचरा गाडी उपलब्ध करून द्यावी. पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी समुद्रात विसर्जन झाल्यानंतर मूर्तीची विल्हेवाट तातडीने लावण्यात यावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. गिरगाव चौपाटी आणि समुद्रकिनारी भाविकांच्या सुरक्षेसाठी गरजेनुसार लाइफगार्डची संख्या वाढविण्यात येईल. शाडूच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दोन ते तीन व्यक्तींना परवानगी देण्याबाबतही आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. समुद्रातील भरती-ओहोटीची माहिती गणेश मंडळांना वेळेवर मिळावी, यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्याद्वारे माहिती देण्याची सूचनाही करण्यात आली. गणपती आगमनाच्या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत. रस्त्यालगतच्या झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करावी. तसेच रस्त्यावरील अनावश्यक केबल वायर काढून टाकाव्यात, असे निर्देश महापालिकेला देण्यात आले. खेतवाडी येथील १ ते १४ गल्लीमध्ये पावसामुळे पाणी साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी महापालिकेने वेळोवेळी औषध फवारणी करावी, असेही लोढा यांनी सांगितले.



गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहत असल्याने आवश्यक ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात यावेत. तसेच गणेश मंडळांच्या आवारात पार्क केलेल्या वाहनांवर गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करू नये, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी बैठकीत केली. खेतवाडी येथील शाळेत हिरकणी कक्ष सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.



गणेशोत्सवाच्या काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या गणेश मंडळांना भेडसावत असल्याने बेस्ट उपक्रमाने यावर तातडीने उपाययोजना करावी. रात्रीच्या वेळी गणेश मंडळे आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मुबलक वीजपुरवठा सुनिश्चित करावा, असे निर्देश लोढा यांनी दिले. मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील प्रमुख चौकांवर विद्युत रोषणाई करून परिसर सुशोभित करण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिका आणि बेस्ट प्रशासनाला दिल्या. दरम्यान, काही गणेशोत्सव मंडळांचे डिपॉझिट रिफंड अद्याप मिळाले नसल्यास संबंधित मंडळांनी धरम पॅलेस येथील कार्यालयात अर्ज करावा. संबंधित प्रकरणांची कार्यवाही करून रिफंड मिळवून देण्यात येईल, असेही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.



महापालिकेने कसली कंबर


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या डी विभागाकडून गिरगाव चौपाटीवर विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. गिरगाव चौपाटीवरील वाळूमध्ये वाहने रुतू नयेत, यासाठी १,१९४ फ्लेट्स वाळूमध्ये बसविण्यात येणार आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चौपाटी परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर १३ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गर्दी आणि सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांसाठी वॉच टॉवरचीही व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर