काठमांडू : भारतात अग्निवीर योजनेअंतर्गत तरुणांची भरती सुरू असताना नेपाळमध्ये मात्र याच योजनेत सहभागी होण्यासाठी हजारो तरुण आणि माजी सैनिकांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवार, 12 ऑगस्ट रोजी पश्चिम नेपाळमधील पोखरा शहरात मोठी रॅली काढून नेपाळी तरुणांना भारतीय लष्कराच्या अग्निवीर योजनेअंतर्गत भरती होण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. (Nepal Agniveer Recruitment Rally)
भारतीय लष्करातील गोरखा भरती का थांबली?
भारतीय लष्करातील गोरखा सैनिकांची भरती 2019 पासून रखडली आहे. सुरुवातीला कोविड-19 महामारीमुळे भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर भारताने 2022 मध्ये अग्निवीर योजना लागू केल्यानंतर नेपाळने आपल्या नागरिकांच्या भारतीय लष्करातील भरतीला परवानगी दिलेली नाही. नेपाळ सरकारच्या भूमिकेनुसार, अग्निवीर योजनेतील सेवा अटी भारत, नेपाळ आणि ब्रिटन यांच्यात 1947 मध्ये झालेल्या त्रिपक्षीय कराराच्या तरतुदींशी सुसंगत नाहीत. त्यामुळे नेपाळी तरुणांची भारतीय लष्करातील भरती थांबवण्यात आली. (Nepal Agniveer Recruitment Rally)
अग्निवीर योजनेवर नेपाळचा आक्षेप काय?
अग्निवीर योजनेअंतर्गत निवड झालेल्या जवानांना चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर त्यापैकी जास्तीत जास्त 25 टक्के जवानांना कायमस्वरूपी सेवेत ठेवले जाते. उर्वरित 75 टक्के जवानांना एकरकमी आर्थिक रक्कम देऊन सेवेतून मुक्त केले जाते. त्यांना पेन्शन किंवा दीर्घकालीन सेवा लाभ मिळत नाहीत. याच मुद्द्यावर नेपाळ सरकारने आक्षेप घेतला आहे. मात्र, नेपाळमध्ये रोजगाराच्या मर्यादित संधी असल्याने अनेक तरुण अजूनही भारतीय लष्करात सहभागी होण्यास इच्छुक आहेत. (Nepal Agniveer Recruitment Rally)
‘भारतीय लष्करात संधी द्या’, पोखरात आंदोलन :
याच मागणीसाठी पोखरा येथे इंडियन एक्स-सर्विसमेन गोरखा ब्रिगेड नेपाळच्या बॅनरखाली रॅली काढण्यात आली. या आंदोलनात माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांसह परदेशी सैन्यात भरतीसाठी प्रशिक्षण घेणारे तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात फलक घेऊन आंदोलकांनी नेपाळी तरुणांसाठी अग्निवीर भरती पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. तरुणांना आखाती देशांमध्ये रोजगारासाठी जाण्यास भाग पाडण्याऐवजी भारतीय लष्करात सेवा करण्याची संधी मिळावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. (Nepal Agniveer Recruitment Rally)
गोरखा सैनिकांची परंपरा टिकवण्याची मागणी :
अग्निवीर भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, यामुळे नेपाळी तरुणांच्या रोजगाराच्या संधी वाढतील आणि गोरखा सैनिकांची ओळख व दीर्घकाळाची लष्करी परंपरा कायम राहण्यास मदत होईल, अशी मागणी आंदोलकांनी केली. याशिवाय, माजी सैनिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि आपल्या नावात ‘एक्स-सर्विसमेन’ असा उल्लेख असलेल्या संस्थांच्या नोंदणीवर निर्बंध आणू नयेत, अशीही मागणी करण्यात आली. अशा संघटना माजी सैनिकांचे अधिकार, सन्मान आणि हितसंबंध जपण्यासाठी आवश्यक असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. (Nepal Agniveer Recruitment Rally)
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन :
दरम्यान, नेपाळ सरकार आपल्या भूमिकेत बदल करून गोरखा तरुणांसाठी भारतीय लष्करातील अग्निवीर भरती पुन्हा सुरू करण्यास परवानगी देणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Nepal Agniveer Recruitment Rally)