मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची या वर्षीच्या हंगामासाठी 'ब्रांड ॲम्बेसेडर' म्हणून निवड करण्यात आली आहे. लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मुंबईच्या या पारंपारिक खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा संकल्प सोडला असून, भविष्यात दहीहंडीचा राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) आणि ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
उद्घाटनाच्या दिवशी सर्व सहभागी संघांच्या कर्णधारांनी रॅम्प वॉक केला आणि त्यानंतर मानवी मनोरा (ह्युमन पिरामिड) रचून पारंपरिक गोविंदा संस्कृतीचे दर्शन घडवले. या लीगच्या माध्यमातून तब्बल ३,२०० गोविंदा खेळाडूंना आपली कला दाखवण्याची आणि स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याची संधी मिळत आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल याने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जबाबदारी सांभाळली होती, तर यंदा मुंबईचाच स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर, चौथ्या हंगामातही प्रो गोविंदाने या पारंपरिक खेळाला जागतिक ओळख मिळवून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
ऑलिंपिकपर्यंतच्या प्रवासाचे स्वप्न : पत्रकारांशी बोलताना पूर्वेश सरनाईक म्हणाले, "दहीहंडी हा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित खेळ नसून तो जागतिक स्तरावर पोहोचावा हे आमचे स्वप्न आहे. दहीहंडी ऑलिंपिकमध्ये कशी जाणार यावर काही लोक हसतात; पण स्वप्न पाहणे चुकीचे नाही. त्यासाठी २५ वर्षे लागली तरी मी कठोर परिश्रम करेन. प्रथम राष्ट्रकुल स्पर्धा आणि त्यानंतर ऑलिंपिकपर्यंत हा खेळ पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन."