चंदीगड : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या (DA) मागणीसाठी पंजाबमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सामूहिक रजा घेत आंदोलन केले. यामुळे चंदीगडमधील पंजाब राज्य सचिवालयातील कामकाज ठप्प झाले. कर्मचाऱ्यांनी सरकारकडे महागाई भत्ता देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे एक पथक जालंधरहून रवाना झाले. (Punjab)
दरम्यान, या आंदोलनावरून काँग्रेसने मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या सरकारवर टीका केली. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वॉरिंग यांनी दिला.
दुसरीकडे, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या योग्य मागण्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र, संप सुरू ठेवून चर्चा होऊ शकत नाही. आधी संप मागे घ्या, त्यानंतरच सरकार चर्चा करेल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यामुळे महागाई भत्त्याच्या मागणीवरून पंजाब सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Punjab)






