टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी केवळ शाश्वत ऊर्जेकडे वळणे पुरेसे ठरणार नसून, भविष्यात पृथ्वीचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अंतराळातील प्रगत तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणावरील भू-अभियांत्रिकीची गरज भासेल, असे त्यांनी म्हटले आहे.
एलॉन मस्क यांनी अशी संकल्पना मांडली की, भविष्यात चंद्रावर उभारलेल्या ‘मास ड्रायव्हर्स’च्या मदतीने पृथ्वी-सूर्य लॅग्रेंज बिंदूंवर विशेष उपग्रह प्रक्षेपित केले जाऊ शकतात. हे सौरऊर्जेवर चालणारे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित उपग्रह पृथ्वीवर पोहोचणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करून जागतिक तापमान संतुलित ठेवण्याचे काम करू शकतील.
१ अब्ज वर्षांपर्यंत तापमान नियंत्रण शक्य?
एलॉन मस्क यांच्या मते, अशी अंतराळ-आधारित प्रणाली भविष्यात पृथ्वीवरील तापमानवाढीचा प्रभाव तब्बल १ अब्ज वर्षांपर्यंत नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. एआय-संचालित उपग्रहांचा समूह पृथ्वीवर येणाऱ्या सौर ऊर्जेचे प्रमाण सूक्ष्म पातळीवर नियंत्रित करेल, अशी त्यांची कल्पना आहे.
काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने ...
मानवजातीसमोर मोठे धोके
हवामान बदलाबरोबरच मानवजातीसमोर आणखी गंभीर धोके असल्याचेही मस्क यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, पृथ्वीच्या इतिहासात सुमारे प्रत्येक १०० दशलक्ष वर्षांनी मोठ्या प्रमाणावर प्रजाती-विनाशाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील संभाव्य संकटांपासून मानवजातीचे संरक्षण करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. “तापमान नियंत्रित करण्यासाठी अंतराळातील उपग्रह आणि मोठ्या प्रमाणावरील भू-अभियांत्रिकीची आवश्यकता असेल. अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते,” असे मस्क यांनी स्पष्ट केले.
आपल्याकडे केवळ ५० वर्षांचा अवधी
दीर्घकालीन उपायांबरोबरच तातडीच्या कृतीची गरज अधोरेखित करताना एलॉन मस्क म्हणाले, “आपल्याकडे कृती करण्यासाठी सुमारे ५० वर्षे आहेत.” वाढत्या समुद्रपातळीमुळे आणि हवामान बदलामुळे किनारपट्टीवरील लोकसंख्येला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत सहभागी ...
वाढते तापमान चिंतेचा विषय
दरम्यान, जागतिक हवामान अहवालांनुसार पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. ‘बर्कले अर्थ’च्या अंदाजानुसार, २०२५ हे वर्ष आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी तिसरे वर्ष ठरले असून, १८५० ते १९०० या कालावधीच्या सरासरीपेक्षा जागतिक तापमान सुमारे १.४४ अंश सेल्सिअसने अधिक नोंदवले गेले आहे.
हवामान संशोधन निधीवरही चर्चा
मस्क यांची ही भूमिका अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा अमेरिकेत हवामान संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या निधीबाबत चर्चा सुरू आहे. अलीकडेच ट्रम्प प्रशासनाने आर्क्टिक प्रदेशातील हवामान बदलांचा अभ्यास करणाऱ्या ‘आर्क्टिक रिपोर्ट कार्ड’ या वार्षिक अहवालाला दिला जाणारा पाठिंबा थांबवण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयावर अनेक हवामान तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
हवामान बदल, अंतराळ तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यांचा संगम साधणारी एलॉन मस्क यांची ही संकल्पना सध्या चर्चेचा विषय ठरत असून, भविष्यातील हवामान व्यवस्थापनाबाबत नव्या शक्यता आणि प्रश्नही निर्माण करत आहे.