- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा; डिसेंबरमध्ये बीडला मुंबईशी जोडणी
मुंबई : बहुप्रतिक्षित 'बीड-पुणे' रेल्वे येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबरअखेर बीड-मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बुधवारी दिल्या. ( Marathwada Mukti Sangram Din)
सह्याद्री अतिथीगृह येथे 'अहिल्यानगर–बीड–परळी' रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा तसेच 'बीड–पुणे' आणि 'बीड–मुंबई' रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (निर्माण) बी. के. सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव, वरिष्ठ विभागीय अभियंता व्ही. पी. पैठणकर, सीसीएम डॉ. सुमंत देऊळकर, विल्यम केरी यांच्यासह रेल्वे व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- उच्च न्यायालयाचा आदेश; पोलिसांचा सहा वर्षांचा तपास अपुरा, गुन्हा नोंदवून सर्व पैलूंचा तपास करण्याचे निर्देश मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग ...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, बीडसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या 'बीड–पुणे' आणि 'बीड–मुंबई' रेल्वे सेवेसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे 'अहिल्यानगर–बीड–परळी' या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली. गतवर्षी बीडकरांची ४० वर्षांची प्रतीक्षा संपवून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी (१७ सप्टेंबर २०२५ रोजी) 'बीड ते अहिल्यानगर' रेल्वे सेवा प्रत्यक्ष सुरू झाली आणि आता यावर्षी त्याच ऐतिहासिक दिनी 'बीड–पुणे' रेल्वे सेवा सुरू होत आहे. ( Indian Railways)
'बीड–पुणे' रेल्वे सुरू झाल्यानंतर जिल्ह्याची पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट व अधिक सक्षम रेल्वे जोडणी निर्माण होणार आहे. यामुळे बीडच्या कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आणि व्यापार क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून नागरिकांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होण्यासही मदत होणार आहे. बीडच्या आर्थिक विकासासाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ( Beed Pune Train Start)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सूचना देताना सांगितले की, १७ सप्टेंबर रोजी 'बीड–पुणे' रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी उर्वरित सर्व तांत्रिक, प्रशासकीय व सुरक्षाविषयक प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात. त्याचबरोबर डिसेंबरअखेर 'बीड–मुंबई' रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून आवश्यक कामांचा कालबद्ध आराखडा तयार करून सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत.