Wednesday, September 2, 2026

Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणात मंत्री नितेश राणेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने वेधले अनेकांचे लक्ष

Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणात मंत्री नितेश राणेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने वेधले अनेकांचे लक्ष

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचे गूढ आता केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासातून उलगडणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने बुधवारी सीबीआयला या प्रकरणात गुन्हा नोंदवून नव्याने तपास करण्याचे निर्देश दिले. उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर काही तासांनी मंत्री नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात एक एक्स पोस्ट केली आहे. या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जून २०२० मध्ये दिशा सालियनचा मृतदेह बॉयफ्रेंड रोहनच्या इमारतीच्या आवारात आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला होता. त्यावेळी दिशाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली असा प्रश्न अनेकजण विचारत होते. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी दोन टप्प्यांत सुमारे सहा वर्ष तपास केला. पण हा तपास अपुरा आणि परिणामकारक नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या तपासातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याऐवजी उलट अधिक प्रश्न निर्माण झाल्याचेही न्यायालयाने निकालात नमूद केले. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियनच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी गुन्हा नोंदवून नव्याने तपास करण्याचे निर्देश सीबीआयला दिले आहेत.

उच्च न्यायालयाने सीबीआयला तपासासाठी निर्देश दिल्यानंतर काही तासांनी मंत्री नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात एक एक्स पोस्ट केली. याआधी दिशाच्या मृत्यूचा सखोल तपास व्हावा अशी मागणी खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांनी केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशाचा मृतदेह मालाडमध्ये आढळला होता. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. संशयास्पद घडामोडींची माहिती पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना दिली होती. या पार्श्वभूमीवर दिशाच्या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मंत्री नितेश राणेंनी एक्स पोस्ट केल्यामुळे त्याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. मंत्री नितेश राणे यांनी एक्स पोस्ट करत' सत्यमेव जयते' अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री नितेश राणेंच्या एक्स पोस्टमुळे आता दिशा प्रकरणात ठोस तपास होईल आणि मृत्यूचे रहस्य उलगडेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

दिशाच्या मृत्यूनंतर मालवणी पोलिसांनी ९ जून २०२० रोजी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७४ अंतर्गत तपास केला आणि २६ ऑक्टोबर २०२० रोजी अहवाल सादर केला. हा अहवाल ४ फेब्रुवारी २०२१ रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी स्वीकारला आणि प्रकरण बंद झाले. मात्र मृत्यूबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे महाराष्ट्र सरकारने ११ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई पोलीस आयुक्तांना पुढील तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १२ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा तपास सुरू करण्यात आला. हा तपास एप्रिल २०२६ पर्यंत चालला आणि १४ एप्रिल २०२६ रोजी अहवाल सादर करण्यात आला. या तपासातही नव्याने कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे नमूद करून पूर्वीच्या निष्कर्षाचीच पुनरावृत्ती करण्यात आली. ६ मे २०२६ रोजी हा अहवाल स्वीकारण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही तपासांत मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचा निष्कर्ष निघाला होता आणि घातपाताचा पुरावा आढळला नव्हता. मात्र उच्च न्यायालयाने या तपासाच्या पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणेंनी 'सत्यमेव जयते' अशी सूचक एक्स पोस्ट केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा