जकार्ता : इंडोनेशियात 240 हून अधिक प्रवाशांना घेऊन पूर्व जावाहून दक्षिण कालीमंतनकडे निघालेल्या एका प्रवासी जहाजाचा जावा समुद्रात अचानक संपर्क तुटला आहे.या घटनेनंतर इंडोनेशियातील बचाव पथकांनी रविवारी सकाळपासून जहाजाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. जहाजामध्ये 241 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
'व्हर्गो ट्रान्सपोर्ट 8' हे जहाज पूर्व जावा प्रांतातील सुराबाया शहरातून दक्षिण कालीमंतनमधील बंजारमासिनकडे रवाना झाले होते. रविवारी पहाटे सुमारे 2 वाजता जहाजाशी संपर्क तुटला. त्यानंतर सुमारे दोन तासांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली.
जहाज खराब हवामानात अडकल्याची माहिती ऑपरेटरकडून मिळाल्यानंतर शोध आणि बचाव यंत्रणांना सतर्क करण्यात आले. बंजारमासिन येथील शोध आणि बचाव कार्यालयाचे प्रमुख आय पुटू सुदयाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, जहाजाचे शेवटचे ज्ञात स्थान बंजारमासिन येथील धक्क्यापासून सुमारे 148 किलोमीटर अंतरावर जावा समुद्रात असल्याचे समोर आले आहे.
जहाजाच्या प्रवासी यादीत 241 प्रवाशांची नोंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
जहाजाची ऑपरेटर कंपनी PT व्हर्गो योएल रिहीने दिलेल्या माहितीनुसार, हे जहाज शनिवारी सकाळी 10:13 वाजता सुराबाया येथून बंजारमासिनच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, प्रवासादरम्यान त्याच्याशी संपर्क तुटला.
घटनेची माहिती मिळताच बंजारमासिनच्या बसिरीह शोध आणि बचाव धक्क्यावरून पथक रवाना करण्यात आले. तसेच जहाजाचे शेवटचे ज्ञात ठिकाण लक्षात घेऊन बचाव नौकाही त्या दिशेने पाठवण्यात आली आहे.
जहाजात मोठ्या संख्येने प्रवासी आणि कर्मचारी असल्याने शोधमोहीम अधिक वेगाने राबवण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधने एकत्र करण्यात येत आहेत. इंडोनेशियाची शोध आणि बचाव यंत्रणा सागरी अधिकारी तसेच इतर संबंधित संस्थांच्या मदतीने ही मोहीम राबवत आहे. खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने समुद्रातील परिस्थितीवरही सतत लक्ष ठेवले जात आहे.