केसरी – मराठा या पत्रांचे संपादक व राजकीय नेते असणा-या साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकरांचा आज जन्मदिन. सोलापूर जिल्हय़ातील मोडनिंब येथे दि. २४ ऑगस्ट १८७२ रोजी त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील सामाजिक इतिहासाचे साक्षीदार असणारे केळकर १९१२ मध्ये पुणे नगरपालिकेचे उपाध्यक्ष आणि पुढे अध्यक्ष होते. १९१८ मध्ये काँग्रेस व होमरूल लीगतर्फे इंग्लंडला गेलेल्या शिष्टमंडळाचे ते चिटणीस होते. तेथे त्यांनी ब्रिटिश इंडिया काँग्रेस कमिटीच्या ‘इंडिया’पत्राचे संपादनही केले. १९२१ मध्ये बडोदा येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या केळकरांनी ‘केसरी’ आणि ‘सह्याद्री’ मासिकचे संपादन केले. राजकारणात मध्यममार्गी भूमिका स्वीकारणा-या केळकरांनी टिळकांनंतर महात्माजींच्या असहकार आंदोलनातही काही काळ सक्रिय सहभाग घेतला. ‘तोतयाचे बंड’ व ‘कृष्णार्जुन युद्ध’ ही त्यांची प्रसिद्ध नाटके. टिळकांचे त्रिखंडात्मक चरित्र लिहिणा-या केळकरांच्या समग्र साहित्याचे १२ खंड प्रसिद्ध झाले आहेत. सुमारे १५००० पृष्ठांचे साहित्य प्रकाशित झालेल्या या साहित्य सम्राटचे ‘गतगोष्टी’ हे आत्मवृत्त प्रसिद्ध आहे. प्रसन्न शैलीत साहित्याचे सर्व प्रकार हाताळणारे हे साहित्यसम्राट न. चिं. केळकर दि. १४ ऑक्टोबर १९४७ रोजी इहलोक सोडून गेले.