Home रिलॅक्स फार न शिकलेला महाराष्ट्राचा शहाणा माणूस वसंतदादा पाटील..

फार न शिकलेला महाराष्ट्राचा शहाणा माणूस वसंतदादा पाटील..

1

महाराष्ट्र दादांना कधीही विसरू शकणार नाही. एक स्वातंत्र्यसेनानी, देशासाठी पाठीवर गोळी झेललेला एक लढवय्या नेता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झटकन क्रांतिकारी विचारधारा बदलून विकासाचा, सहकाराचा विचार राबवून माळरानावर सहकार फुलवणारा महाराष्ट्राचा फार न शिकलेला शहाणा माणूस म्हणजे दादा.

दादांची उद्या २६ वी पुण्यतिथी..

बघता बघता २६ वर्षे झाली. दादा गेले. महाराष्ट्राचा सामान्य माणसाचा मोठा आधार गेला. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दादांएवढा मोठा माणूस महाराष्ट्रात नाही. दादा न शिकलेले. पण शिकलेला दादांच्या पुढे फिका पडे, इतके दादांचे चौरस ज्ञान होते आणि सामान्य माणसाशी जुळलेली नाळ. त्यामुळे दादा सर्वाथाने ‘दादा’ होते.

स्वातंत्र्याच्या चळवळीत पत्री सरकारात दादा होते. क्रांतिसिंह नाना पाटील, नाथा लाड, बापू लाड, नागनाथ नायकवडी, पांडू मास्तर असे सगळे क्रांतिकारी सातारा जिल्हा घुसळून काढत होते. तेव्हा सांगली जिल्हा झाला नव्हता. दादांना पकडायला बक्षीस होते. दादा पकडले गेले. पण मिरजेच्या तुरुंगातून दादा तुरुंग फोडून सटकले. तटावरून उड-या मारल्या. पोलिसांनी गोळीबार केला. दादांचे साथीदार पांडू मास्तर गोळीबारात बळी पडले.

दादांच्या पाठीत उजव्या बाजूने गोळी घुसली. शस्त्रक्रिया करून ती काढण्यात आली. दादा अनेक वर्षे सांगत असत, ‘स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळ-या झेलणारे अनेक आहेत. मी पाठीवर गोळी झेलली आहे.’ दादांच्या पाठीवर आणि छातीवर दोन्ही बाजूला शस्त्रक्रियेच्या खुणा शेवटपर्यंत होत्या. दादांनी स्वातंत्र्यवीर असल्याचे कधीही भांडवल केले नाही.

दादांचे वागणे, बोलणे, राहणे, पोशाख किती साधा. साध्या माणसांचा साधा प्रतिनिधी म्हणजे दादा. १९५२ साली ते आमदार झाले. ५२, ५७, ६२, ६७, ७२ असे सलग पाच वेळा आमदार होऊनही दादांनी कधीही ‘मला मंत्री करा,’ असे काँग्रेस नेत्यांना सांगितले नाही. दादांचा जीव मंत्रीपदात कधीच नव्हता. ६७ ते ७२ ही पाच वर्षे दादा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते.

१९६७ साली देशात नऊ राज्यांत काँग्रेसची सरकारे पराभूत झाली. महाराष्ट्रात दादा अध्यक्ष, वसंतराव नाईक मुख्यमंत्री या जोडीने काँग्रेसच्या २०२ आमदारांना निवडून आणले. १९७२ साली विधानसभा निवडणुकीत ही संख्या २२२ वर गेली.

महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात मोठा – ज्याला प्रचंड म्हणता येईल – तो विजय दादा प्रदेश अध्यक्ष असताना मिळाला. मग इंदिरा गांधींनी वसंतदादांना चक्क आदेश दिला आणि ते मंत्री झाले. त्यांच्याकडे पाटबंधारे खाते आले. दादा चौथीपर्यंत शिकलेले. म्हणजे शिक्षण जवळ जवळ नाहीच. पण व्यवहाराचे त्यांचे शिक्षण इतके मोठे होते की, दादा एक विद्यापीठच होते. न शिकलेल्या या माणसाला विद्यापीठाने पुढे डी. लिट. ही सन्माननीय पदवी दिली.

दादांचा मोठेपणा असा जगदमान्य झाला. दादा पाटबंधारे मंत्री असताना चाफेकर चीफ इंजिनीअर होते. दादा त्यांना विचारायचे, ‘कुठल्या खो-यात किती पाणी आहे?’ चाफेकर सांगायचे, ‘अमूक टीएमसी आहे.’ दादा म्हणायचे ‘टीएमसी सांगू नका, किती एकर भिजेल ते सांगा..’ दादांचा प्रत्येक शब्द असा व्यवहारी असायचा.

दादा चार वेळा मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात कशातही फरक पडला नाही. ते मुख्यमंत्री असोत किंवा राज्यपाल असोत, ते जेवत असोत किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन घेत असोत. त्यांना भेटायला कोणालाच कधी संकोच वाटला नाही. दादांच्या भोवती माणसे नाहीत, असा कधी दिवस नव्हता. आणि माणसांना भेटून दादा कंटाळले असेही कधी घडले नाही.

सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी कायदा कसा बदलता येतो, हे दादांनी महाराष्ट्राला शिकवले. दादा मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर एका जिल्हा परिषदेतून दुस-या जिल्हा परिषदेत कर्मचा-याची बदली होत नव्हती.

एका स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीचे लग्न ठरले. मुलगा पुण्यात, मुलगी औरंगाबाद जिल्हा परिषदेत. बदलीची मागणी झाली. बदली करता येत नाही, असे सांगण्यात आले. विषय दादांपर्यंत गेला. दादांनी संबंधित खात्याच्या सचिवाला बोलावले.

सचिवाने सांगितले, ‘दादासाहेब, आपला नियम असा आहे की, एका जिल्हा परिषदेतून दुस-या जिल्हा परिषदेत बदली होत नाही.’ दादा म्हणाले, ‘म्हणून तर तुम्हाला बोलावले. आजपासून एका ‘जिल्ह्यातून’ दुस-या ‘जिल्ह्यात’ बदली करता येईल, असा प्रस्ताव तयार करून माझ्याकडे आण आणि माझी सही घे..’ त्याच दिवशी संध्याकाळी शासनाने तसा निर्णय जाहीर केला. जे करायचे ते सामान्य माणसाच्या हिताचे असेल तर लगेच करायचे. त्यात कोणतीही लाल फित दादांना आडवी आली नाही.

आज जी नवी मुंबई उभी राहिली त्या नव्या मुंबईतल्या जमिनी सिडकोसाठी ताब्यात घेण्याचा सगळा विषय दादा मुख्यमंत्री असताना हाताळला गेला. त्याला आता चाळीस वर्षे झाली. फार मोठे आंदोलन झाले. दि. बा. पाटील त्या आंदोलनाचे नेते होते.

दादा मुख्यमंत्री होते म्हणूनच त्या काळात शेतक-याला चाळीस हजार रुपयांच्या पुढे भाव मिळाला. दादा शेतक-यांचे कैवारी होते.

राज्य कर्मचा-यांच्या संपात दादांची भूमिका कर्मचा-यांच्या ठाम विरोधात होती. संघटित लोकांना खूप फायदे मिळतात. असंघटित शेतक-याला असे फायदे मिळत नाहीत, हे दादा ठासून सांगायचे. पुढे दादांनी शेतकरी संघटना काढली. त्यासाठी ते मोर्चा काढून रस्त्यावरही उतरले.

दादा मुख्यमंत्री असताना त्यांना भाषेची अडचण कधीच आली नाही. मला इंग्रजी येत नाही, हिंदीत चांगले बोलता येत नाही, याचा संकोच त्यांना कधीच वाटला नाही. एकदा विधानसभेत चेंबूरचे जनसंघाचे आमदार हशू आडवाणी यांनी प्रश्न विचारला, ‘मुख्यमंत्रीजी, केंद्र सरकार महाराष्ट्र के लिए इतनी बडी राशी देने के बावजूद राज्य सरकार ये राशी क्यों नही उठा रही हैं..’

मुख्यमंत्री असलेले दादा उठले आणि त्यांनी सांगून टाकले, ‘अध्यक्ष महाराज, ऐसा है अंथरूण देखके पाय पसरना मंगता है..’ सारे सभागृह हसू लागले. त्यावेळचे मिश्कील आमदार केशवराव धोंडगे यांनी अध्यक्षांना विचारले, ‘अध्यक्ष महाराज हे उत्तर कोणत्या भाषेत आहे?’ दादाच उठले. आणि म्हणाले, ‘केशवराव, हशूजींकरिता हिंदीत आणि तुमच्याकरिता मराठीत. हाशूजी आपको समझा ना..’ हशूजींनी मान डोलवली.

निर्णय क्षमता हा दादांचा फार मोठा गुणविशेष होता. ते बोलत कमी. पण मनाला जे वाटेल ते लगेच कृतीत आणत. दादांना न विचारता प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदावर श्रीमती प्रभा राव यांची नियुक्ती श्री. राजीव गांधी यांनी करून टाकली. ही बातमी आली मात्र.. दादा मुख्यमंत्री कार्यालयातून उठले.

तडक राज्यपालांकडे गेले आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन घरी निघून गेले. कोणाला काय झाले समजायच्या आत ‘वर्षा’ हा सरकारी बंगला सोडून, मुख्यमंत्र्यांची सरकारी गाडी परत करून आपल्या बळीराम ड्रायव्हरला बोलावून दादा घरी गेलेसुद्धा. बातमी वा-यासारखी पसरली. कार्यकर्त्यांची गर्दी जमली. रात्री राजीव गांधींचा फोन आला.

राजीव गांधी समजावत होते. दादांनी स्पष्टपणे सांगितले, ‘मुख्यमंत्र्याला किमान अध्यक्षपदाचा बदल सांगून कराल की नाही? तुमची ही पद्धत मला मान्य नाही..’
आज पंचायत समितीचे सदस्यत्व कोणी सोडायला तयार होणार नाही. इथे दादांनी मुख्यमंत्रीपद सहज सोडून दिले. राजीव गांधींनी त्यांना राजस्थानचे राज्यपाल केले. त्या राज्यपाल पदातही दादा रमले नाहीत. कुठे बाहेर जायचे नाही, सरकारी कार्यक्रमांच्या बंधनात राहायचे. हे दादांना मानवत नव्हतं.

राजभवनवर लोकांना भेटायला अडचण होती. दादांनी राज्यपालपदही सोडून दिले. दादांना पदाचा लोभ कधीच नव्हता. त्यांच्या वागण्यात इतका साधेपणा होता की, त्यावेळचे सचिव दादांकडे असे बघत बसायचे. एकदा राज्यशिष्टाचार विभागाचा सचिव सांगू लागला की, ‘हरारेचे पंतप्रधान उद्या रात्री येत आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत मुख्यमंत्र्यांनी करावे, अशी दिल्लीहून सूचना आहे.’

दादांनी विचारले, ‘हे हरारे कुठे आहे?’ मग नकाशा आणून दादांना हरारे दाखवण्यात आले. नकाशात तिथे एक ठिपका होता. दादा म्हणाले, ‘अरे हे तर सांगलीपेक्षा लहान दिसते आहे. राज्यमंत्री अजहर हुसेनना पाठवून द्या..’ आणि दादा त्या पंतप्रधानांच्या स्वागताला गेले नाहीत. दादांचे असे किती किस्से आणि त्यांचे साधेपण असे कितीतरी प्रसंगात जाणवत राहायचे. ख-या अर्थाने ज्यांना लोकनेता म्हणता येईल, असे दादा यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा, राजाराम बापू अशी विकासाचा ध्यास घेतलेली माणसे आता होणे नाही.

वसंतदादांची खरी सेवा केली ती यशवंत हाप्पे यांनी. दादांचा तोच सेवक. दादांचे मुख्यमंत्रीपद गेले तेव्हा दादा म्हणाले, ‘यशवंता, आता तुला दुसरीकडे कुठे काम मिळाले, तर बघ बाबा.. तुझे नुकसान नको. ’ यशवंताच्या डोळय़ांत पाणी आले. तो म्हणाला, ‘दादा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही..’ यशवंत दादांना सोडून कधीच गेला नाही. दादांनी त्यांच्याच पुतण्याच्या लग्नमंडपात यशवंतचे लग्न करून दिले आणि त्याला जीवन जगता येईल, इतपत प्रतिष्ठेचा एक व्यवसायही उभा करून दिला. आजही दादांची पुण्यतिथी यशवंतच दरवर्षी साजरा करतो आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version