‘प्रवास.. नित्य नवा सहवास’.. स्वत:ला नवीन काही गवसण्याचा प्रवास, नव्या वाटा-नवी वळणे, नवा देश, नवा प्रदेश, स्वत:च्याच प्रवासानंतरचा नवा कोरा वास.. प्रवास केला पाहिजे यार. मला तर एकटय़ानं प्रवास करायला आवडतो. नवे प्रदेश, नवे देश, नवी माणसे, नवे चेहरे बघायचा मला ध्यास लागतो.. आणि अनोख्या प्रसंगांना मला सामोरं जायला मिळतं.. काही माणसं बसमध्ये, रेल्वेमध्ये खिडकीकडे तोंड करून बसून राहतात, त्यांना सहप्रवाशाच्या जीवनात अजिबात डोकोवायला आवडत नाही. काही आपल्याच मोबाईलवर तासन्तास टुकुटुकु करत राहतात. नंतर गाणी ऐकतात. काही लॅपटॉप काढून ‘आपण खूप कामाची माणस आहोत’ अशा अविर्भावात असतात. काही घरचेच अन्न आपल्याला चालते असे सांगत आपला डबा खात बसतात. या कोणाबद्दलही मला राग नाही. त्यांचे त्यांचे स्वभाव!! पण मला मात्र गप्प बसता येत नाही. मला सहप्रवासी आवडतात. त्यांच्या सुख-दु:खांशी समरस व्हायला आवडते. माझी झटपट मैत्री होते.
‘मी दिलीपकुमारच्या घरासमोर राहतो’ त्यांच्या गाडय़ा, व्यवसाय आदीबद्दल मला त्यांनी सांगितलं. अत्यंत श्रीमंत माणूस होता तो.. शिरीषकाका! मुंबईला उतरल्यावर त्यांची एक गाडी आली. त्यांनी मलाही माझ्या इच्छितस्थळी सोडलं. काकांनी माझा पत्ता घेतला. माझ्या वाढदिवसाला अचानक एक पार्सल घरी आलं. अत्यंत सुंदर रोझ गोल्डचं टायटन रागाचं घडय़ाळ आतमध्ये. कोण कुठले सहप्रवासी पण केवढी आपुलकी.. स्नेह!
रोमानियाला गेले असता एका आंतरराष्ट्रीय परिषदेत स्लोवेनियाची माया थ्रायनर मला भेटली. दोन दिवसात आम्ही जीवाभावाच्या मैत्रिणी होऊन गेलो. कधी कधी जन्मभर सोबत राहून लोक फक्त ‘ओळखी’चे होतात आणि कधी एखाद्या दिवसाच्या ओळखीत जन्मभराचे मित्र. मायाने स्लोवेनियाचे नुसते आमंत्रण दिले नाही, सगळय़ा सुविधा पुरविल्या. पाच वर्षानंतर मी तिला जाऊन भेटले. हिरव्या हिरव्या डोंगरात आमची मैत्री अधिक ‘हिरवीगार’ झाली. जाण्यापूर्वी तिनं तिच्या हातातलं एक सुंदर कडं मला स्वत: घातलं. अश्रू भरल्या नयनांनी निरोप दिला.
प्रवासानं मला खूप साधं आणि खरं राहायला शिकवलं. जगण्यावर प्रेम करायला शिकवलं. प्रेम वाटायला शिकवलं. जे जे नैसर्गिक आहे ते ते सुंदर आहे, त्याचा सन्मान राखायला शिकवलं. अनेक त-हेचे स्वभाव असतात. त्यांच्याशी जुळवून घ्यायला शिकवलं. अजूनही बरेचसे सहप्रवासी आहेत. डॉ. अंजू व डॉ. ऊर्मी बडोदा, फरीदाआंटी वसरेवा अंधेरी, अगदी रत्नागिरीचेही मणी नायर आहेत. त्यांच्याविषयी मी सांगितलंच नाही, कारण प्रातिनिधिक नाव सांगून विषय पूर्ण करायला हवा नाही तर लेखनप्रवासात मी वाहत जाईन..
प्रवासानंतर घरी परतावंच लागतं.. दैनंदिनी सुरू होते. पण डोक्यात आठवणी असतात आणि मनाच्या गाभा-यात मिळालेलं नि:स्वार्थी, निरलस, निर्व्याज प्रेम आणि आनंद! आणि घरच्या दिवाणखान्यात असतात नीलानं दिलेलं पुस्तक, काकांनी दिलेलं घडय़ाळ आणि मायानं दिलेलं कडं!
डॉ,निधी पटवर्धन ,आपला लेख आवडला ,प्रवासातली मैत्री ! विषय छान आहे ,धन्यवाद !
धनंजय हळर्णकर .
दोहा / कतार.