शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीपासून ते लावणीपर्यंत आणि खुरपणीपासून ते मळणीपर्यंतची सर्व कामे महिलाच करतात. अगदी शेतात पिकलेले धान्य नीट जपून ठेवण्यापासून ते त्याचे रुचकर पदार्थ करून कुटुंबाचे उदरभरण करण्यापर्यंत सर्व काही महिलाच करीत असतात. मात्र असे असले तरी त्या महिलांना शेतकरी म्हणून काय स्थान आहे? शेतीच्या सातबारा उता-यावरही त्यांचा कुठे उल्लेख नसतो, मग सरकारतर्फे होणा-या शेतकरी मेळाव्यात त्यांचा सन्मान होणे दूरच. शेतात खपणा-या, राबणा-या या शेतकरी महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्याबरोबरच शेतीविषयक साक्षर करण्याचा ध्यास घेतला आहे जळगावच्या ज्योत्स्ना विसपुते यांनी! स्वत: शिक्षिका, पती प्राध्यापक असा सुखाचा संसार सुरू असताना शेतकरी महिलांच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि त्याबाबत त्यांच्या काय योजना आहे, हे त्यांच्याच शब्दात..
शेतकरी आणि महिला शेतकरी मोठया प्रमाणात शेतात कष्ट उपसतात, त्यांनी केलेल्या कष्टाच्या बदल्यात त्यांना मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. कारण कच्चा माल मातीमोल भावाने बाजारात विकावा लागतो. आपण इतर कोणताही माल घ्यायला बाजारात जातो त्या वेळी विकणारी व्यक्ती त्यांच्या मालाचा भाव ठरवते. शेतकरी हा एकमेव घटक असा आहे की, जो आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत घेऊन जातो आणि तिथे मिळेल तो भाव स्वीकारतो. त्याच मालावर पुढे प्रक्रिया केली जाते आणि त्याच्या कितीतरी पटीने पैसे मग मधले दलाल कमवितात. यासाठी माझी एक संकल्पना आहे. प्रत्येक गावात शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजेत. शेंगदाणा, करडई, सरकी, सोयाबीन तुमच्या शेतात पिकतात, मग काढा की आपल्या गावात एक तेल गाळण्याचा घाणा. मातीमोल भावाने शेंगदाणे घालून महागाचे तेल खरेदी करण्यापेक्षा आपल्याच मालाचे तेल काढा. तुम्हाला आवश्यक असेल तेवढे घरात ठेवून घ्या, बैलांना पेंड ठेवा आणि उरलेले तेल व पेंड बाजारभावाने नेऊन विका, असे छोटे-छोटे प्रक्रिया उद्योग सुरू करता येतात. कडधान्याच्या डाळी बनविल्या, त्या नीट पॅक केल्या तर त्याला चांगला भाव मिळू शकतो. उद्योगमंत्री नारायण राणे यांना ही संकल्पना सांगितली तेव्हा त्यांना खूप आवडली. त्यांनी कोकणामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रक्रिया उद्योगाची माहिती दिली आणि अशा समूहाने महिला शेतकरी काही प्रक्रिया उद्योग सुरू करीत असतील तर त्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीसुद्धा प्रयत्न करता येतील, असे सांगून माझा उत्साह वाढविला आहे. शेतीचे माती परीक्षण ही अत्यंत आवश्यक बाब आहे. त्याबाबत शेतकरी महिलांमध्ये मोठया प्रमाणात अज्ञान दिसते.
जोपर्यंत कोणत्या मातीमध्ये कोणते घटक कमी आहेत हे समजणार नाही, तोपर्यंत त्यांना कोणत्या प्रकारचे खत द्यायचे हे कसे कळणार? एखाद्या शेतीमध्ये एखादा घटक पुरेसा असतानाही खताच्या माध्यमातून तो जर आणखी वाढविला तर त्या खताचा अनुकूल परिणाम होण्याऐवजी विपरीत परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. जसे आपण जेवलेले असताना कुणी तरी आग्रह केला म्हणून आपण खातो, मग आपल्याला अजीर्ण होते. त्याबाबत महिला शेतक-यांमध्ये जागृती करण्याचा आमचा मनोदय आहे. माती परीक्षणाबरोबर आंतरपिके आणि बांधांवरील फळझाडांची लागवड याचे महत्त्व पटवून द्यावे लागणार आहे. पूर्वीच्या महिला आताच्या महिलांपेक्षा जास्त काम करायच्या, परंतु त्यांना फारसे आजार नसायचे. कारण आपल्याच शेतात होणारे सीताफळ, करवंद, बोर, आंबे, जांभूळ अशी विविध फळझाडे बांधावर, पडिक जमिनीत असायची. त्या फळांतून मिळणा-या पौष्टिक घटकांमुळे शरीरस्वास्थ्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली असायची. आता पडिक जमीन उरलेली नाही. बांधांवर फळझाडे लावण्यासाठी सरकारचे अनुदान मिळते ते अनेकदा कुणाला माहीतच नसते. म्हणून ती झाडे कुणी लावत नाहीत. त्याबाबत महिला शेतक-यांमध्ये जागृती करण्याचा माझा मानस आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतीच्या सातबारावर महिलांचे नाव आले पाहिजे. सरकारने योजना जाहीर करतानाच तशी तरतूद करणे गरजेचे आहे. त्यासाठी कायदा झाला पाहिजे. ज्या सातबारांवर महिलेचे नाव आहे, त्यांनाच शेतीविषयक योजनांचा लाभ मिळेल, अशी सक्ती केली तरच शेतात कष्टणा-या महिलांना त्यांचा हक्क मिळू शकेल. कामे खूप आहेत. शेतकरी महिलांचे दु:ख हलके करीत असतानाच तिच्या हक्काची तिला जाणीव करून देणे, त्यांना ते हक्क मिळवून देणे हाच एक ध्यास घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. काही अडचणी असल्या तरी अनेकांचे सहकार्यही मिळत आहे. ही केवळ एक मोहीम न राहता तिचे चळवळीत रूपांतर व्हावे आणि जगाला जगविणारी शेतकरी महिला सुखी व्हावी, यासाठीच अखेपर्यंत प्रयत्न करण्याचा माझा निर्धार आहे.
(शब्दांकन : शामसुंदर सोन्नर)