विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांपैकी मुंबईतील जवळपास ८० टक्के आमदार व्यावसायिक असल्याचे सिद्ध झाले आहे.
मुलुंड मतदारसंघातील विजयी उमेदवार सरदार तारासिंह हे व्यावसायिक आहेत. विक्रोळी मतदारसंघात मनसेला हरवून विजयी झालेले शिवसेनेचे सुनील राऊत जाहिरातीच्या व्यवसायात आहेत, तर मुंबईचे माजी महापौर आणि दिंडोशीचे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार सुनील प्रभू कमिशन एजंटचा व्यवसाय करत असल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
अंधेरी पूर्वचे शिवसेनेचे रमेश लटके हेही व्यावसायिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्फेकर केबल नेटवर्किंगचा व्यवसाय करत असून संजय पोतनीस कन्सल्टन्सीचा व्यवसाय करत आहेत.
गोरेगावमधील भाजपच्या विद्या ठाकूर जरी गृहिणी म्हणून प्रतिज्ञापत्रात नोंद केलेली असली तरी त्यांचे पती व्यावसायिक असल्याचे सर्वश्रुत आहे. अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत.
मुंबईतील ३६ मतदारसंघांत निवडून आलेल्या ३० आमदारांनी आपण व्यावसायिक असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. धारावीच्या वर्षा गायकवाड, वरळीचे सुनील शिंदे, माहीमचे सदा सरवणकर यांनी समाजकारण हाच व्यवसाय असल्याचे म्हटले आहे. काही आमदारांनी राजकारण हाच व्यवसाय असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. काही आमदार हे पेशाने वकील आहेत.
यात भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा, आशीष शेलार, राज पुरोहित यांचा समावेश आहे. या वकील आमदारांचा राज्याच्या राजकारणात किती फायदा होतो, हे येणारा काळच ठरवेल. व्यावसायिक असलेल्या या आमदारांनी महाराष्ट्राचा विकास करण्याच्या धर्तीवर व्यवसायाच्या गोष्टी करायला हव्यात, स्वत:च लाभार्थी होऊन जनतेचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा विकास होणार नसल्याचे मत जनतेने व्यक्त केले आहे.
अरे बाबा ! प्रथम स्वताचा खिसा भरा ! नंतर जनतेचा विचार करा !! असे जो करील तोच जनतेचा सेवक खरा !!.जय महाराष्ट्र !!