मुलींच्या शिक्षणासाठी ज्या पाकिस्तानमध्ये मलालाने दहशतवाद्यांच्या गोळ्या झेलल्या तेथेच केवळ मुलीला जन्म दिल्याने ५६ महिलांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
पाकिस्तानमधील जानेवारी २०१२ ते सप्टेंबर २०१३ या काळात ९० महिलांवर अॅसिड फेकण्यात आले. ७२ महिलांना जाळण्यात आले. तर घरगुती हिंसेचे तब्बल ४९१ गुन्ह्यांची नोंद झाल्याचे मानवाधिकार आयोगाचे सदस्य आय.ए.रेहमान यांनी सांगितले. देशात सामूहिक बलात्काराच्या ३४४ गुन्हांची नोंद झाली आहे. तर महिलांच्या विरोधातील हिंसाचाराच्या ८३५ गुन्हे झाले आहेत.
यातील सर्वात धक्कादायकबाब म्हणजे केवळ मुलीला जन्म दिला म्हणून ५६ महिलांची हत्या करण्यात आल्याचे मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे. मुलींना जन्म दिला म्हणून महिलांची हत्या केली जाते त्या समाजाला मुल्याधारित समाज म्हणता येणार नाही, असे रेहमान यांनी म्हटले आहे. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी घोषणांच्या ऐवजी प्रत्यक्षात कृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.