स्कूलबस सुरक्षेविषयी परिवहन विभाग गंभीर नसल्याचा आरोप स्कूलबस ओनर्स असोसिएशनने केला आहे. सध्या शाळांना सुट्टया असल्याने स्कूलबस, त्यांचे चालक, वाहक आणि महिला सेविका यांना परिवहन विभागामार्फत सुरक्षेविषयी प्रबोधन करणे गरजेचे आहे.
मुंबई – स्कूलबस सुरक्षेविषयी परिवहन विभाग गंभीर नसल्याचा आरोप स्कूलबस ओनर्स असोसिएशनने केला आहे. सध्या शाळांना सुट्टया असल्याने स्कूलबस, त्यांचे चालक, वाहक आणि महिला सेविका यांना परिवहन विभागामार्फत सुरक्षेविषयी प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जावे. तसेच स्कूलबस मधील अद्ययावत यंत्रणाही परिवहन विभागाने पहावी, अशी मागणी असोसिएशनचे केली आहे.
त्याबाबत असोसिएशनकडून परिवहन विभागाला आणि सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना पत्र देण्यात आली आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला. हे आरोप परिवहन विभागाने फेटाळले आहेत.
सुट्टीच्या काळात स्कूलबस सुरक्षेबाबत चर्चा व्हावी, स्कूल बसमध्ये सुरक्षेसाठी लावण्यात आलेली यंत्रणा परिवहन विभागाला पाहता यावी, यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. याबाबत परिवहन विभागाला पत्राने कळवले असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. मात्र, तसे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी मधुकर जाधव यांनी स्पष्ट केले. तसेच स्कूलबस मालकांना काही अडचणी असतील, तर त्याबाबत चर्चा करण्याची तयारी असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
स्कूलबसविषयीच्या धोरणांची अंमलबजवणी झालीच पाहिजे. यात तीळमात्र शंका नाही. अन्यथा कूचराई करणा-यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. स्कूलबस सुरक्षेबाबत अनेक वेळा चर्चा झाली असून, आता त्याची अंमलबजावणी स्कूलबस मालकांनी करावी, असे आवाहन जाधव यांनी केले.