पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील प्रसिद्ध तारापीठ येथे सोमवारी सकाळी एका खासगी हॉटेलला भीषण आग लागली. या दुर्घटनेत हॉटेलमध्ये राहणाऱ्या 6 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. आगीमुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. (West Bengal)
मिळालेल्या माहितीनुसार, तारापीठमधील ‘बिदिशिनी’ हॉटेलच्या तळमजल्यावर सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. हॉटेल तलावाजवळ आणि तारापीठ पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर आहे. आग लागल्याचे लक्षात येताच हॉटेलमधील पाहुण्यांमध्ये घबराट पसरली. (Hotel Fire)
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी बचावकार्य सुरू करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीत गंभीररित्या भाजल्यामुळे 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून त्याबाबत पोलिसांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. (Fire Incident)
आगीच्या घटनेत जखमी झालेल्या अनेकांना हॉटेलमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने रामपूरहाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच तारापीठ आणि रामपूरहाट पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी परिसराची पाहणी करून घटनेचा तपास सुरू केला आहे. आगीमागचे नेमके कारण शोधण्यासाठीही तपास केला जात आहे. (Tarapith Hoptel)
अग्निशमन दलाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हॉटेलमधील विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता आहे. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. या दुर्घटनेमुळे तारापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Fire)