Tuesday, September 8, 2026

Mary Kom : ‘मी मेरीला घडवलं' म्हणणाऱ्यांना मेरी कॉमचं सडेतोड उत्तर; म्हणाली...

Mary Kom : ‘मी मेरीला घडवलं' म्हणणाऱ्यांना मेरी कॉमचं सडेतोड उत्तर; म्हणाली...

मुंबई : सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०’ सुरू होताच घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ६ सप्टेंबरला झालेल्या ग्रँड प्रीमियरनंतर अवघ्या काही दिवसांतच स्पर्धकांमध्ये मतभेद आणि शाब्दिक चकमकी पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री माही विजच्या ‘बॉसी’ अंदाजावरून घरातील वातावरण तापलेलं असतानाच, बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम यांच्या स्पष्टवक्तेपणानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

माही विजने घरात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीपासूनच काही कामांबाबत इतर स्पर्धकांना सूचना देताना दिसली. सामान आणण्यावरून तिची अमन गांधीसोबत शाब्दिक चकमक झाली, तर चहा बनवण्याच्या मुद्द्यावरून ईशा रिखीसोबतही तिचा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. माहीच्या या वागण्यावर अरिश्फा खानसह काही स्पर्धकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अरिश्फा-आम्रपालीमध्येही वाद

दरम्यान, पहिल्या कॅप्टन्सी टास्कदरम्यान अरिश्फा खान आणि आम्रपाली दुबे यांच्यातही जोरदार शाब्दिक वाद झाला. अरिश्फाला ‘बच्ची’ म्हणून संबोधल्याच्या मुद्द्यावरून दोघींमध्ये खटके उडाले. वाद वाढत असतानाच माही विजनेही त्यात हस्तक्षेप केला, त्यामुळे घरातील वातावरण आणखी तापलं. कॅप्टन्सीच्या टास्कमध्येही स्पर्धकांमध्ये रणनीती आणि मतभेद पाहायला मिळाले.

मेरी कॉमचं स्पष्ट वक्तव्य चर्चेत

या सगळ्या गोंधळात बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉमच्या वक्तव्यानेही विशेष लक्ष वेधलं आहे. जिओ हॉटस्टारने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये मेरी कॉम आणि रोहीद खान यांच्यात संवाद होताना दिसत आहे. आपल्या बॉक्सिंग कारकिर्दीतील संघर्षाबद्दल बोलताना मेरी कॉमने आपल्या यशाचं श्रेय दुसऱ्याने घेण्याच्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.

 

मेरी कॉम म्हणाली की, जेव्हा कोणी ‘त्याने मला घडवलं’ असं म्हणतं, तेव्हा त्यांना राग येतो. “तो म्हणतो की, मी मेरीला घडवलं. पण तो स्वतः कधी रिंगमध्ये उतरला नाही, कधी मार खाल्ला नाही आणि फारसा सरावही केला नाही. मी मात्र रात्रंदिवस सराव केला. अन्न-पाण्याची, झोपेची पर्वा न करता मेहनत केली. हे सोपं नाही, करून बघा,” असं म्हणत त्यांनी आपल्या मेहनतीची आणि संघर्षाची जाणीव करून दिली.

मेरी कॉमच्या या वक्तव्यावर रोहीद खाननेही सहमती दर्शवताना दिसत आहे. त्यांच्या संवादातून स्वतःच्या कर्तृत्वाची किंमत आणि त्यामागील संघर्ष अधोरेखित झाला आहे.

एकीकडे माही विजच्या वागण्यावरून घरातील स्पर्धकांमध्ये नाराजी आणि वाद सुरू झाले आहेत, तर दुसरीकडे अरिश्फा-आम्रपालीमधील शाब्दिक चकमकीनेही वातावरण तापलं आहे. त्यातच मेरी कॉमच्या स्पष्ट वक्तव्यामुळे ‘बिग बॉस २०’च्या सुरुवातीपासूनच चर्चेला चांगलाच रंग चढला आहे. आता पुढील भागांमध्ये या वादांना कोणतं वळण मिळतं आणि घरात कोणाचा दबदबा निर्माण होतो, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा