Wednesday, September 16, 2026

Girish Mahajan : मनोज जरांगेंची १३वी मागणी पूर्ण करणे अशक्य

Girish Mahajan : मनोज जरांगेंची १३वी मागणी पूर्ण करणे अशक्य

मंत्री गिरीश महाजन; कायद्यात बसत नसलेल्या मागणीचा आग्रह धरू नये

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच केली असली तरी त्यांच्या १३ मागण्यांपैकी शेवटची मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याची भूमिका मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी स्पष्ट केली. कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्याची मागणी कायद्यात बसत नसल्याने ती मान्य करता येणार नाही, असे सांगत जरांगे यांनी या मागणीचा आग्रह धरू नये, असे आवाहन महाजन यांनी केले. सरकारने जरांगे यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले. (Girish Mahajan)

“कास्ट व्हॅलिडिटी रद्द करून टाका, ही मागणी शक्य नाही. अशा काही मागण्या आहेत की, त्या कायद्यामध्ये कुठेही बसत नाहीत. त्या पूर्ण करता येणार नाहीत,” असे महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या समाजातील अनेक तज्ज्ञांनीही सरकारची भूमिका मान्य केली असल्याचे सांगत, सरकार सकारात्मक असताना जरांगे यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असेही त्यांनी म्हटले. (Girish Mahajan)

जरांगे यांच्या आंदोलनाबाबत सरकारची भूमिका यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली असल्याचे महाजन यांनी सांगितले. जरांगे यांच्याशी अनेकदा चर्चा झाली असून सरकारची शिष्टमंडळेही त्यांच्याकडे गेली आहेत. त्यांच्या जवळपास १३ मागण्या होत्या आणि त्यापैकी १२ मागण्या मान्य झाल्याचे महाजन यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यापूर्वी १३ पैकी १२ मागण्या मान्य झाल्याचे सांगत, उर्वरित मागणी न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले होते. (Girish Mahajan)

“जशास तसे उत्तर” देण्याचा सरकारचा प्रश्नच नसून हा विषय संपवायचा आहे, असे महाजन यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत मराठा समाजाला सरकारने न्याय देण्याचे काम केले असून, गरीब मराठा विद्यार्थ्यांसाठी विविध सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत, असा दावा त्यांनी केला. ओबीसी समाजाला मिळणाऱ्या काही सोयी-सवलतींच्या धर्तीवर मराठा समाजालाही सुविधा देण्यात आल्याचे सांगत हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अनेकांना एसईबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला असून नोकऱ्याही मिळाल्याचे ते म्हणाले. (Girish Mahajan)

दरम्यान, जरांगे यांनी आंदोलन थांबवावे, अशी सरकारची भूमिका असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मुंबईकडे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात असून, या संदर्भातील निर्णय पोलिसांकडून घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. (Girish Mahajan)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >