मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. बीड जिल्ह्यातील दौरा आटोपून मुख्यमंत्री बुधवारी रात्री मुंबईत परतले. यानंतर अनिल अंबानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी अनिल अंबानींसोबतच्या भेटीआधी आणि भेटीनंतर निवडक सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत निती आयोगाची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील नवीन उद्योगांची रुपरेषा, अनेक महत्त्वाचे प्रकल्प, रखडलेले प्रकल्प मार्गी कसे लावता येतील याबाबत चर्चा झाली. या बैठकीचा आणि अनिल अंबानींच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचा संबंध असल्याची चर्चा सुरू आहे. अनिल अंबानी आणि फडणवीस यांच्या भेटीचे कारण अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही. पण या भेटीला महत्त्व आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतरची ही अनिल अंबानींची त्यांच्यासोबतची पहिलीच बैठक आहे. लवकरच राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, या पार्श्वभूमीवर अनिल अंबानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे. देवेंद्र फडणवीस अलिकडेच दाओसच्या दौऱ्यावरुन आले आहेत. या दौऱ्यात झालेल्या भेटीगाठींचा आणि अनिल अंबानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा काही संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही.