अबू कतालला पाकिस्तानकडून संरक्षण देण्यात आले होते. पाकिस्तानच्या लष्कराचे निवडक जवान आणि लष्कर - ए - तोयबा या अतिरेकी संघटनेचे सदस्य अबू कतालचे संरक्षण करत होते होते. एवढे संरक्षण असूनही अबू कतालची हत्या झाली. झेलम परिसरातील दिना पंजाब विद्यापीठाजवळील झीनत हॉटेलजवळ अबू कतालच्या दिशेने गोळीबार करण्यात आला.
हाफिझने अबू कतालला स्वतःच्या संघटनेत चीफ ऑपरेशनल कमांडर या पदावर नियुक्त केले होते. तर एनआयएने २०२३ च्या राजौरीतील स्फोटात अबू कतालचाच हात असल्याचे त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
राजौरीतील धांगरी गावात १ जानेवारी २०२३ रोजी अतिरेकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोन मुलांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर २० एप्रिल २०२३ रोजी भट्टा / दुरिया येथे पाच भारतीय जवानांना अतिरेक्यांनी ठार केले होते.
अबू कताल हा फक्त लष्कर - ए - तोयबासाठीच नाही तर इतर अतिरेकी संघटनांसाठीही मार्गदर्शक म्हणून पाकिस्तानमध्ये कार्यरत होता.