मुंबईतील कबुतरांची (pigeon) संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे श्वसनाच्या आजाराचा धोकाही वाढत आहे. या विषयावर गेल्या काही वर्षांपासून समाजाच्या विविध स्तरातून जनजागृती सुरू आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने कबुतरखान्यांना विरोध केला आहे.
कबुतरखान्यांना विरोध मागील काही वर्षांपासून सुरू आहे. आता याची तीव्रता वाढू लागली आहे. अनधिकृत कबुतरखाने वाढू लागल्यामुळे मनसेने जाहीरपणे मुंबईतील कबुतरखान्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे मुंबतल कबुतरखाने बंद होण्याची शक्यता वाढली आहे.
मुंबईत ठिकठिकाणी कबुतरांसाठी धान्य विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे धान्य विकत घेऊन तिथेच कबुतरांसाठी टाकले जात असल्यामुळे कबुतरांची संख्या वाढते आहे. ही कबुतरे मग आजूबाजूच्या रहिवासी इमारतीच्या खिडक्यांमध्ये घर करतात. त्यामुळे त्यांच्या विष्ठेतून व पिसांमधून श्वसनाचे आजार पसरत आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळणारे हे अनधिकृत कबुतरखाने बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे, असे मनसेच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी सांगितले.