गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. देशात राजकीय बदल झाला तरी केवळ तेवढ्याने भागत नाही. सरकार आपले असले तरी व्यवस्था आपली नाही. पोलिस, महसूल, न्यायव्यववस्था अशा सर्व क्षेत्रांत वेगळे लोक आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणजे आपण यशस्वी झालो, असे नाही. व्यवस्था बदलण्याचे मोठे आव्हान आहे; असे माधव भांडारी म्हणाले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी मुंबईत माधव भांडारी यांनी केले. याप्रसंगी सनातन संस्थेचे अभय वर्तक, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे भावे उपस्थित होते.
सत्ता बदलली तरी पोलिस व्यवस्था बदललेली नाही. दाभोलकर हत्या प्रकरणात शिक्षा झालेले शरद कळसकर आणि सचिन अंदुरे निर्दोष आहेत. त्यांची सुटका होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. आमच्या कामाचा बारामतीच्या काकांना राग होता. यामुळेच अप्रत्यक्षपणे दाभोलकर हत्या प्रकरणात अडकवून हिंदुत्ववादी संघटनेचे कंबरडे मोडण्याचे काम केले गेले अशी टीका ॲड. संजीव पुनाळेकर यांनी केली. तर महाराष्ट्र अंनिसवर प्रशासक नेमा आणि संघटनेच्या कामाची तपासणी करा. या संघटनेला नक्षलवादी संघटना म्हणून जाहीर करा, अशी मागणी सनातन संस्थेचे अभय वर्तक यांनी केली.