परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन
ठाणे : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ-ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात देशातील पहिल्या इ-ट्रॅक्टरची नोंदणी करताना बोलत होते. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिणी पाटील, इ-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे व सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे हे उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, सन २०३० पर्यंत रस्त्यावरील एकूण वाहनांच्या संख्येमध्ये २० ते ३० टक्के वाहने ही विजेवर चालणारी असावीत, असे शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने इ-वाहनांना टोल माफी व खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनाने आखली आहे. याचा फायदा इ-ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे.
तसेचच इतर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये इ-ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च जवळ जवळ शून्य आहे. तसेच वापर करताना लागणाऱ्या वीजेचा खर्च डिझेल इंधनाच्या तुलनेत ६० ते ७० टक्के ने कमी होणार आहे. त्यामुळे भविष्यात इ-ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा ‘किमयागार’ ठरणार आहे. ऑटोनेक्स्ट या कंपनीने भारतातील पहिला स्वदेशी निर्मित इ-ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणला आहे.