विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पात सात वर्षांपूर्वी बांधलेला पुलाचा अडसर

या पुलाच्या बांधकामासाठी खर्च केलेला २७ कोटींचा पैसा जाणार वाया


मुंबई : मुंबई महानगरपालिकेने तब्बल सात वर्षांपूर्वी म्हणजे सन २०१८ साली बांधलेला गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाणपूल आता विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्प कामांमध्ये अडथळा ठरत आहे. त्यामुळे हे पूल आता पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे सात वर्षांपूर्वी यावर सुमारे २७ कोटी रुपयांचा खर्च केला होता, त्यामुळे हे पूल पाडल्यास यावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता असून हे पूल कायम ठेवून कोस्टल रोड प्रकल्प वेगळ्या पध्दतीने साकारता येणार नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.


पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सन २०१८ साली गोरेगाव येथे वीर सावरकर उड्डाणपूल अर्थात एमटीएनएल येथील पूल बांधला होता. सुमारे २७ कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा पूल अवघ्या सात वर्षांत पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (वर्सोवा ते दहिसर) हा पूल अडथळा ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


गोरेगाव पश्चिमेतील वीर सावरकर उड्डाणपूल पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट जोडतो. या पुलामुळे गोरेगाव आणि मालाड परिसरातील प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांवरून १० मिनिटांवर आला होता. त्यामुळे अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची मागणी पूर्ण झाली होती. परंतु, आता हाच पूल मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात अडथळा ठरत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.


कोस्टल रोड प्रकल्पासाठी वीर सावरकर उड्डाणपूल पाडल्यानंतर त्या जागी दुमजली पूल उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. या दुमजली पुलाचा वरचा भाग मालाडमधील माइंडस्पेसपासून दिंडोशी कोर्टापर्यंत पोहोचेल, तर खालचा भाग सध्याच्या वीर सावरकर उड्डाणपुलाची जागा घेईल. यामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणी मिळणार आहे. तसेच, कोस्टल रोडमधून गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर थेट प्रवेश देण्यासाठी हा दुमजली पूल महत्त्वाचा ठरेल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


या प्रकल्पामुळे वर्सोवा ते भाईंदरपर्यंतचा प्रवास सुकर होणार असला तरी, त्यासाठी एक महत्त्वाचा आणि नुकताच बांधलेला पूल तोडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सात वर्षांपूर्वी जेव्हा या पुलाची योजना तयार झाली, तेव्हा भविष्यात येणाऱ्या कोस्टल रोडचा विचार का करण्यात आला नाही, असा सवाल नागरिक करत आहेत. जर प्रशासनाने या निर्णयावर पुनर्विचार केला नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.