बलुचिस्तानमध्ये एकाच वेळी १२ ठिकाणी हल्ले

१२ सुरक्षा कर्मचारी, तर ३७ दहशतवादी ठार


बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए)ने एकाच वेळी १२ पेक्षा अधिक ठिकाणी समन्वयित हल्ले करून देशाच्या सुरक्षेला मोठे आव्हान दिले. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये किमान १२ सुरक्षा कर्मचारी ठार झाले असून प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत ३७ दहशतवादी मारले गेले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण बलुचिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी क्वेटा, पसनी, मस्तुंग, नुश्की आणि ग्वादर जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हल्ले करण्यात आले. राजधानी क्वेटामध्येच किमान चार पोलीस कर्मचारी ठार झाले. मात्र, हे चार पोलीस कर्मचारी एकूण १० मृतांमध्ये समाविष्ट आहेत की नाही, याबाबत अजूनही माहिती मिळू शकलेली नाही. क्वेटातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दहशतवाद्यांनी नुश्की जिल्ह्याचे उपआयुक्त (डिप्टी कमिशनर) यांचे अपहरण केल्याची माहिती दिली आहे.


बीएलएने या संपूर्ण मोहिमेला ‘ऑपरेशन हेरोफ’ असे नाव दिले आहे. संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात लष्करी तळ, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, लष्करी हालचालींमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी काही प्रमुख महामार्ग बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


क्वेटा शहरात अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. संपूर्ण शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून मुख्य रस्ते निर्मनुष्य झाले होते आणि बाजारपेठा बंद राहिल्या. ३८ वर्षांचे खासगी कर्मचारी अब्दुल वली यांनी सांगितले, “सकाळपासून सतत स्फोट होत आहेत. माझी आई रुग्णालयात दाखल आहे, तिला रक्ताची गरज आहे. मात्र पोलीस आम्हाला परत पाठवतात आणि पुढे गेल्यास गोळी घालण्याची धमकी देतात. अशा परिस्थितीत आम्ही काय करावे?”


या हल्ल्यांपूर्वीच एक दिवस आधी पाकिस्तानी सैन्याने दावा केला होता की, बलुचिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या मोहिमांमध्ये ४१ बंडखोरांना ठार करण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या या समन्वयित हल्ल्यांमुळे सुरक्षा यंत्रणांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.


बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात गरीब प्रांत मानला जातो. नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असूनही शिक्षण, रोजगार आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत हा प्रांत देशातील इतर भागांपेक्षा मागे आहे. अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेला लागून असलेला हा प्रदेश दीर्घकाळापासून हिंसाचार आणि बंडखोरीने ग्रासलेला आहे. बलुच फुटीरतावादी संघटना, विशेषतः बीएलए, सरकारी सैन्य, परदेशी नागरिक आणि इतर प्रांतांतील मजुरांना लक्ष्य करत आहेत. त्यांच्या मते, बलुचिस्तानच्या संसाधनांचे शोषण होत असून स्थानिक लोकांचे हक्क डावलले जात आहेत.


ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२५ नुसार, बुर्किना फासो नंतर पाकिस्तान जगातील दुसरा सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश ठरला आहे. २०२४ मध्ये पाकिस्तान चौथ्या स्थानावर होता. अहवालानुसार, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या हल्ल्यांमध्ये ९० टक्के वाढ झाली असून बीएलएच्या हल्ल्यांमध्ये सुमारे ६० टक्के वाढ झाली आहे. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे पाकिस्तानमधील सर्वाधिक दहशतवादग्रस्त प्रदेश असून देशातील एकूण दहशतवादी घटनांपैकी ९० टक्के याच भागात घडत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.