मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या कामाच्या दरम्यान अभियंत्यांची उपस्थिती असणे अनिवार्य आहे. कंत्राटदारामार्फत केल्या जाणाऱ्या कामामध्ये संपूर्ण पारदर्शकता रहावी, यासाठी अभियंत्यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. जर कुठेही जाणिवपूर्वक गैरप्रकार करण्याचा कुणी प्रयत्न केला, असे निदर्शनास आले तर कंत्राटदार व अधिकारी या दोघांवर अत्यंत गंभीर कारवाई केली जाईल, याची दक्षता घ्यावी, असा इशारा वजा सूचना. बांगर यांनी दिला.


मुंबईतील नाले आणि नद्या स्वच्छतेची कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी मुंबईमहानगरपालिका प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजनावर भर दिला जात आहे. या अनुषंगाने मुंबई महानगरातील लहान व मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी मिठी नदी व पूर्व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेस्वच्छता कामांची शुक्रवारी ३ एप्रिल २०२६ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) कल्पना राऊळ, उप प्रमुख अभियंता संजय इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.


मुंबई महानगरपालिकेकडून १२ मार्च २०२६ पासून गाळ काढण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. पूर्व उपनगरांतील मिठी नदीवर सुरू असलेल्या तीन पॅकेज अंतर्गत पाच ठिकाणी कामांची सुरुवात झाली आहे. त्यापैकी तीन ठिकाणी (कनेक्टर ब्रिज, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील एमएमआरडीए कार्यालय (जेतवन उद्यान) आणि अंबानी शाळालगत) बांगर यांनी भेट दिली. यासोबतच मुलुंड पूर्व (टी विभाग) येथील बाऊंड्री नाला, घाटकोपर (एन विभाग) येथील सोमय्या नाला येथेही भेट दिली. तसेच आवश्यक ते निर्देश दिले. यासोबतच गाळ काढण्याच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवून त्यांच्या सूचनांच्या बाबतीत गांभीर्याने पूर्तता करावी, अशाही सूचना बांगर यांनी केल्या.


मुंबईतील मिठी नदीच्या तीनही पॅकेज अंतर्गत आणि मोठ्या, छोट्या नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. ज्याठिकाणी पावसाचे पाणी तुंबते अशा ठिकाणांवर प्राधान्याने आणि सुयोग्य नियोजनासह लक्ष देण्यात यावे. पाणी साचण्याच्या ठिकाणांबाबत आवश्यक कार्यवाही करून तो निकाली निघेल, अशा पद्धतीने नालेसच्छतेच्या कामांचे नियोजन करावे. नालानिहाय कामे कधी सुरू होणार, कधी संपणार याचे काटेकोर नियोजन करण्यात यावे. ही माहिती नालेसफाईच्या महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून आपल्या परिसरातील नालेसफाईचे काम कधी सुरू होणार आहे व कधी संपणार आहे, याची माहिती नागरिकांना मिळणे शक्य होईल. नालानिहाय दर दिवसाला केल्या जाणाऱ्या कामाचे उद्दिष्ट निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी होईल, याची दक्षता घ्यावी. कंत्राटदाराने निविदा अटीशर्तीप्रमाणे किती यंत्रसामुग्री वापरात आणणे अपेक्षित आहे व दररोज किती यंत्रसामुग्री उपलब्ध आहे, याची अद्ययावत माहिती उपलब्ध करावी. ही माहिती नालेसफाईच्या संगणक प्रणालीवरसुद्धा (डॅशबोर्ड) प्रदर्शित करण्यात यावी. नाल्यांमधील पाण्यावर वाहणारा तरंगता कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी शक्य तेथे तरंगता कचऱ्याला अटकाव करणारी यंत्रणा अर्थात ट्रॅशबुम प्रणाली लावण्यात यावी, असे विविध निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.



मिठी नदी शेजारी उभारा व्हीआयपींसाठी स्वागत


मिठी नदीच्या सफाईसाठी जिथे ९० ते १२० दिवसांची गरज असताना प्रत्यक्षात केवळ ६० दिवसांचा कालावधी मिळत आहे. त्यामुळे या नदीसह नाल्यांची योग्यप्रकारे सफाई होणे आवश्यक आहे. परंतु आता सर्वच लोकप्रतिनिधीं या गाळाच्या सफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी मिठी नदीच्या ठिकाणी भेटी देत आहे आणि प्रत्येकाला प्रमुख अभियंता आणि उपप्रमुख अभियंताच त्यांच्या स्वागतासाठी हवा आहे. त्यामुळे ते नाराज होत असून आधीच मिठी नदीसह नाल्यांची सफाईचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण करणे आवश्यक असताना भेटी देणाऱ्या व्हीआयपींच्या मागे अधिकाऱ्यांना धावावे लागते. त्यामुळे आता मिठी नदीसह मोठ्या नाल्यांच्या शेजारी स्वागत कक्ष उभारुन तिथे सध्या कामाचा भार नसलेल्या प्रमुख अभियंता दर्जाचा अधिकारी बसवला जावा अशी मागणी आता विनोदान केली जाते. जेणेकरून त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या हाताला काम मिळेल आणि भेटी देणाऱ्यांचे स्वागत करायलाही अधिकारी सज्ज असेल आणि त्यामुळे या विभागावरील नाराजी कमी होईल,असे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या