मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; नाशिक धर्मांतर आणि ड्रग्ज प्रकरणाचाही घेतला आढावा
मुंबई : "भोंदू अशोक खरात प्रकरणात दोषी असणारी व्यक्ती कितीही प्रभावशाली असली तरी तिला सोडता कामा नये. या प्रकरणात पीडित महिलांना पूर्ण संरक्षण देऊन भक्कम पुरावे गोळा करा, जेणेकरून न्यायालयात अपराधसिद्धी (कन्व्हिक्शन) होण्यास मदत होईल", असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी गृहविभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीला पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी अशोक खरात प्रकरणासह नाशिकमधील धर्मांतर, तसेच गोरेगाव ड्रग्ज आणि परतवाडा येथील प्रकरणांचा विस्तृत आढावा घेण्यात आला.
धर्मांतर आणि ड्रग्ज विरोधात 'मोहीम'
नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेल्या धर्मांतर प्रकरणाचीही मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. "राज्यात धर्मांतराचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. नाशिक पोलिसांनी हे प्रकरण उजेडात आणले हे अभिनंदनीय आहे, मात्र आता यातील सर्व 'पॅटर्न' आणि 'अँगल' तपासून कसून तपास करा," असे आदेश त्यांनी दिले.
गोरेगाव आणि परतवाडा प्रकरणाची गंभीर दखल
याचबरोबर गोरेगाव आणि परतवाडा येथील प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी पोलिसांना आक्रमक पवित्रा घेण्यास सांगितले. "ड्रग्ज हे तरुणाईच्या भविष्याला लागलेली वाळवी आहे. त्यामुळे ड्रग्जविरोधात व्यापक मोहीम राबवा. परतवाडा प्रकरणातील पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यासाठी प्रोत्साहित करा आणि यात सामाजिक संस्थांचीही मदत घ्या," असेही त्यांनी स्पष्ट केले.