मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास मे महिन्याचे वेतन रोखले जाण्याची शक्यता असल्याने शिक्षक संघटनांनी तातडीने कार्यवाहीचे आवाहन केले आहे.
राज्य शासनाने २७ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार शासकीय, निमशासकीय तसेच अनुदानित संस्थांमधील सर्व कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, अंमलबजावणीदरम्यान अनेक शिक्षकांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
जर आधार क्रमांक पगार खात्याशी जोडलेला असेल तर स्वतंत्र ऑनलाइन प्रक्रिया आवश्यक नसून केवळ ई-केवायसी फॉर्म भरून बँकेत पडताळणी करावी लागेल. मात्र, आधार इतर खात्याशी लिंक असल्यास एनपीसीआय पोर्टलवर जाऊन पगार खाते अद्ययावत करणे आवश्यक आहे. तसेच नाव, जन्मतारीख किंवा इतर तपशीलांमध्ये तफावत असल्यास ती तातडीने दुरुस्त करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
एकूणच, प्रशासकीय आदेश आणि तांत्रिक प्रक्रिया यांचा समतोल राखत शिक्षकांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.