MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला सज्ज होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने “आपली बस आपली सेवा” या व्यापक मोहिमेच्या माध्यमातून प्रवासी सेवेला एक नवी दिशा देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.


एसटी बसेसची संख्या वाढत असली, तरी प्रवासी संख्या आणि महसूल अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याची जाणीव महामंडळाने गांभीर्याने घेतली आहे. याच जाणिवेतून प्रवाशांचा विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी आणि सेवेला मानवी स्पर्श देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे.


सेवेतून संस्कार, शिस्तीतून विश्वास


चालक आणि वाहक हे केवळ कर्मचारी न राहता ‘सेवक’ बनणार आहेत. बस ताफ्यात समाविष्ट करण्यापूर्वी तिची स्वच्छता, वेळेआधी फलाटावर उपस्थिती, नीटनेटका गणवेश आणि शिस्तबद्ध वर्तन यांना आता केवळ नियमांची चौकट नसून, सेवाभावाची ओळख मानली जाणार आहे. बस सुटण्यापूर्वी चालकाने स्वतःची ओळख करून देत प्रवाशांना प्रवासाचा मार्ग, थांबे आणि अपेक्षित वेळ याची माहिती देणे—हा केवळ औपचारिक भाग नसून, प्रवाशांशी नातं जोडण्याचा एक सुसंवादी प्रयत्न असेल. प्रवासादरम्यान मदतीचा हात पुढे करणारा चालक-वाहक हा एसटीचा खरा चेहरा ठरेल.


प्रवासीही सेवेचे सहप्रवासी


या अभियानात प्रवाशांनाही समान सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छता राखणे, मौल्यवान वस्तूंची जबाबदारी स्वतः घेणे, तसेच मोठे सामान योग्य ठिकाणी ठेवणे—या साध्या सवयी प्रवास अधिक सुखकर बनवतील.
तसेच एनसीएमसी स्मार्ट कार्डचा वापर आणि ऑनलाइन आरक्षणाचा स्वीकार ही आधुनिकतेकडे टाकलेली पावले ठरतील.


अडचणीत आधार, सेवेत सातत्य


बस रद्द होणे किंवा मार्गात अडथळे निर्माण होणे या अनपेक्षित परिस्थितींमध्ये प्रवाशांना तत्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. बसस्थानके आणि परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे.


तक्रारींवर तत्पर उपाय


प्रवाशांच्या तक्रारींना केवळ नोंद न मानता, त्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. प्रत्येक स्तरावर नियमित आढावा घेत, सेवेतील उणिवा दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.


नव्या विश्वासाचा प्रवास


राज्यात १ मे २०२६ पासून राबविण्यात येणारी ही मोहीम केवळ सेवा सुधारण्याचा उपक्रम नसून, एसटी आणि प्रवासी यांच्यातील विश्वासाचा नवा सेतू ठरणार आहे.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर