पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बिधाननगर येथे रविवारी (३ मे २०२६) मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली. तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप (BJP) समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष उसळला, ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या घटनेवरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. भाजपने दावा केला की, तृणमूल कार्यकर्त्यांनी त्यांच्या कॅम्पवर पक्षाचे झेंडे लावल्यामुळे वाद पेटला. तर तृणमूल काँग्रेसने उलट आरोप करत केंद्रीय दलांकडून लाठीचार्ज झाल्याचा दावा केला. मात्र, पोलिस आणि केंद्रीय दलांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे परिस्थिती आणखी चिघळली नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या प्रतिनिधींना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी भाजप ५०० ते ७०० मतांनी आघाडीवर आहे, तिथे तात्काळ फेरमतमोजणीची मागणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, प्रतिनिधींनी मतमोजणीपूर्वी जवळच राहावे, जेणेकरून ते वेळेवर केंद्रावर पोहोचू शकतील, असेही त्यांनी सांगितले.






