मृत्यूच्या दाढेतून परतला महाडचा सुपुत्र; कॅन्सरग्रस्त रुग्णाला तब्बल १५ लाखांची मदत
मुंबई : कर्करोगासारख्या महाभयंकर आजाराशी लढा देणाऱ्या महाड येथील एका सर्वसामान्य रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने जीवनदान दिले आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असताना, मयूर चांदुरकर (४२) यांच्यावर वेळेवर उपचार झाल्याने त्यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील व जनहितैषी भूमिकेमुळे या गोरगरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मयूर चांदुरकर यांना गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून किडनीचा आजार होता. त्यातच अचानक त्यांचे वजन वेगाने कमी होऊ लागल्याने आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तपासणीत त्यांचे हिमोग्लोबिन अत्यंत कमी असल्याचे निष्पन्न झाले. रक्त चढवूनही प्रकृती स्थिर राहत नसल्याने डॉक्टरांनी अधिक चाचण्या केल्या. त्यातून त्यांना रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर) असल्याचे समोर आले. मयूर चांदुरकर हे महाडमध्ये किरकोळ व्यवसाय करून आपल्या वृद्ध आई-वडील, आजी, पत्नी आणि दोन लहान मुलांचा उदरनिर्वाह करतात. अशा बिकट परिस्थितीत उपचारासाठी लागणारा १५ ते १८ लाखांचा अवाढव्य खर्च करणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय होते.
मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
- या प्रकरणाची तत्परतेने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचे निर्देश दिले. त्यानुसार, मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. एवढेच नव्हे तर, कक्ष प्रमुखांनी पुढाकार घेत टाटा ट्रस्टकडून १० लाख रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत मिळवून दिली. या भरीव मदतीमुळे चांदुरकर यांच्यावरील उपचारांचा मार्ग मोकळा झाला.
- सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून, १६ एप्रिल २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कर्करोगावर यशस्वी मात करून ते पुन्हा आपल्या घरी परतले आहेत. या कठीण प्रसंगात पाठीशी उभ्या राहिलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल चांदुरकर कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
- रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष