Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा मोठा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील काही भागांत आज देखील अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. काल राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, या भागात १७ मे च्या सकाळपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.


प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर क्षेत्रातील काही दुर्गम किंवा विशिष्ट भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, हवेतील आर्द्रतेच्या उच्च पातळीमुळे नागरिकांचा त्रास आणि अस्वस्थता अधिक वाढली आहे. वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी स्वतःला हायड्रेटेड ठेवावे (भरपूर पाणी प्यावे) आणि दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. मुंबई आणि रायगडमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज असला, तरी वीकेंडला (शनिवार-रविवार) ठाणे आणि रायगडच्या काही भागांत हलका पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



प्रशासनाने वर्धा, नागपूर, अकोला, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे. यासोबतच धाराशिव, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे, तिथल्या नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघातापासून बचावासाठी प्रशासनाकडून काही महत्त्वाच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.



जळगावमध्ये तापमान ४५ अंशांच्या पार : राज्यात मे महिन्यात सूर्य अधिक आग ओकताना दिसत असून, अनेक भागांत ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद होत आहे. जळगावमध्ये सलग ४ दिवसांपासून तापमानाचा पारा ४५ अंशाच्या पार गेला आहे. जळगावमध्ये ४५.३ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली, तर दोन दिवसांपूर्वी हा पारा तब्बल ४५.६ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. तापमान ४५ अंशांच्या वर गेल्याने उकाड्यात आणि उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले असून, नागरिकांची वर्दळ कमालीची घटली आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा कहर सुरू होता. आता तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ४१ अंश सेल्सिअसवर स्थिर आहे. यापूर्वी याच आठवड्यात तापमानाचा पारा तब्बल ४५ अंशांपर्यंत पोहोचला होता. मात्र, तापमानात घट झाली असली तरी हवेत आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्याने उकाडा अजूनही कायम आहे.


Comments
Add Comment

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११